कविता समजून घेताना भाग: चौतीस

By // No comments:

डाव संसाराचा

आभाळ कोपल्यावर तू कच खाल्लास
अन् दोर तोडत गेलास संसाराची
मी गणितं घालत होते उद्याची
तुझ्या वजाबाकीला बेरजेत आणण्याची

संसाराचा डाव मांडलास तूच
मग का उधळून लावलास?
पाखरांना जेव्हा गरज होती
तेव्हाच तू गळफास घेतलास

संसाराचा पसारा आता
एकटीने कसा आवरू
थेंबाथेंबाने गळणाऱ्या घराला
फुटक्या मनगटाने कसे सावरू?

जन्मदात्या बापाची काठी व्हायचे
तर पळपुट्यासारखे पळून गेलास
रडले तर सगळेच रे!
मला मात्र एकांतात छळून गेलास

समाजाला, व्यवस्थेला तोंड देत
एकटीच मी लढते आहे
पोटच्या पोराला मात्र
लढवय्या म्हणून पाहते आहे

केविलवाणी धडपड माझी
डोळ्यात मात्र आशेचा किरण आहे
माझ्या एकटीच्या लढाईला
तुझ्या मायबापाची प्रेरणा आहे

काजवा होऊन लढत राहीन
मला सूर्याची फिकीर नाही
आभाळाला जाऊन सांग
आता
माझ्या सोबतीला आहे काळी आई


अनिता यलमटे

भविष्याच्या धूसर पटलाआड नेमकं काय दडलेलं असतं, हे काळालाही अवगत असतं की नाही, माहीत नाही. तरीही आशेच्या अस्पष्ट कवडशात काळाच्या तुकड्यांना जीव उगीच शोधत राहतो. उगवलेला आज वेदना पदरी टाकून गेला, निदान उद्याच्या गर्भातून अंकुरणारा उजेडाचा एक कवडसा हाती लागेल, या अपेक्षेने माणसे अंधार उपसत राहतात. सगळ्याच वाटा निबिड अंधाराची सोबत करीत निघालेल्या असताना मन मात्र उजेडाच्या प्रतीक्षेत क्षितिजांचे कोपरे कोरत राहते. जगण्याची आधीच तयार करून घेतलेली आखीव रेखीव सूत्रे नसतात. त्यांचे साचे तयार करून अनुरूप आकृत्या नाही साकारता येत कधी. आयुष्याच्या चित्राला मढवण्यासाठी आयत्या चौकटी कोणाला आंदण मिळाल्या आहेत? सांगणे अवघड आहे, कारण अद्याप कोणीच सुखाची वसने परिधान करून वावरत असल्याचे सांगत नाही. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्याच ललाटी वणवण भटकंतीचे अभिलेख नियतीने कोरलेले नसतात. पदरी सुखाचे दान पडूनही समाधानी राहता येतेच असेही नाही.

हाती लागलेल्या प्रत्येक क्षणांचा उत्सव करता यायला हवा, असं कोणी सांगितलं म्हणून काही जगण्याचं नंदनवन होत नसतं. आनंदाचे चार क्षण वेचता आले, म्हणून काही कोणी सुखांच्या पायघड्या आपल्या वाटेवर घालत नसतात. बहरून येण्यासाठी ऋतूंनी अंगणी विसावण्याएवढा विराम आयुष्याला घेता यायला हवा. पण जगणंच उजाड झालं असेल अन् आयुष्य वैराण झालं असेल, तर कोणत्या क्षितिजांकडे अभ्युदयाच्या अपेक्षेने पाहावे? आयुष्याचे अर्थ जगण्यात सापडतात. पुस्तकातून भेटताना, भाषणातून ऐकताना ते देखणे वगैरे वाटत असले, तरी वास्तव कधी एवढं सुगम असतं का? आयुष्याचे सगळे कोपरे प्रश्नचिन्हांनी गोंदले जातात, तेव्हा जगण्याच्या परिभाषा त्यांचा अंगभूत अर्थ हरवतात अन् डोळ्यातून साठवलेली आकांक्षांची अक्षरे आशय. व्याख्या पाठ करून आयुष्य नाही जगता येत. परिभाषा फक्त शब्द मांडतात, पण असण्या-नसण्याचे अर्थ स्वतःलाच शोधावे लागतात. ती न संपणारी शोधयात्रा असते. वणवण असते, मनात अधिवास करून असणाऱ्या आस्थेच्या बिया उगवून येण्याची.

एक अस्वस्थ तगमग घेऊन ही कविता मनाचे कोपरे कोरत राहते. परिस्थितीच्या आघाताने क्षणात होत्याचे नव्हते होते. उद्ध्वस्त करणारा तो एक पळ काळाच्या कुशीत जावून विसावतो. पण मागे अगणित समस्यांच्या पाऊलखुणा कोरून जातो. आयुष्याच्या वाटेवर कोरल्या गेलेल्या त्याच्या आकृत्या एक वेदना असते. काळजाला कापत जाणारा कातरकंप असतो. भळभळती जखम असते ती, वेदनांचा विसर न पडू देणारी. कोण्यातरी डोळ्यात कधी सुखी संसाराची पाखरे भिरभिर करत राहतात. वाऱ्याच्या हात धरून विहार करतात. थकून डहाळीवर येवून विसावतात. पण परिस्थितीच्या आघाताने झाड वठत जातं अन् मागे उरतात केवळ शुष्क अवशेष. स्वप्नांची पाखरे सैरभैर होतात. मुळं मात्र हरवलेला ओलावा शोधत राहतात. मनाच्या आसमंतावर कमान धरणारी इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो परिस्थितीच्या हताशेचा भयाण अंधार, जीवनाला व्यापून टाकणारा. हरवलेली स्वप्ने अन् विखुरलेलं जगणं घेऊन अंधारवाटेने चालण्याशिवाय अशावेळी हाती उरतेच काय?

ज्याच्या खांद्यावर विश्वासाने विसावा घ्यावा, तोच खांदा सगळे पाश सोडून मुक्तीचा मार्ग निवडतो. बंधनातले गुंते विसरून विखरत राहतो. आभाळ कोपल्यावर मुळं घट्ट धरून जमिनीला बिलगून राहावं, पण तोच कच खातो. संसारातून सुटत जातो. परिस्थितीसमोर गुढगे टेकून शरणागती पत्करतो. अगतिक होत राहतो. विकल्प संपतात त्याच्यापुरते. ती मात्र रोजच्या वजाबाकीला बेरजेत आणण्याची गणिते सोडवत राहते. सुखाची सूत्रे अन् समाधानाच्या परिभाषा साकळून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहते. त्याच्या अशा वागण्याचा अर्थ शोधत राहते. पण हाती रितेपणाशिवाय काहीच नाही लागत. संसाराचा डाव मांडून का उधळून लावलास? म्हणून तिचं विकल मन प्रश्न विचारत राहते, त्याच्यासोबत व्यतित केलेल्या आठवणींना.

आकांक्षांच्या चतकोर तुकड्यात वाढवलेल्या झाडाच्या आश्रयाला आलेल्या पाखरांना निवाऱ्याची गरज होती, तेव्हाच झाडाने उन्मळून पडावे आणि काडीकाडी जमा करून बांधलेलं घरटं उधळून जावं. वैराण होण्याइतके आणखी वेदनादायी काय असू शकते? त्याने त्याच्यापुरते उत्तर शोधले. पण संसाराचा पसारा आता एकटीने कसा आवरायचा? थेंबाथेंबाने गळणाऱ्या घराला फुटक्या मनगटाने कसे सावरायचे? त्याच्या अवकाळी जाण्याच्या प्रश्नाहून अधिक जटिल प्रश्न तिच्यासमोर आहे जगण्याचा. हाय खाऊन तो जीवनयात्रा संपवतो. त्याच्यापुरत्या प्रश्नांच्या गुंत्यातून तो मोकळा झालाही असेल; पण त्याच्या पश्चात कुटुंबियांच्या वाट्याला येणाऱ्या रोजच्या मरणयातनांचे काय? अवकाळी मरणातून कोणते प्रश्न कधी संपले आहेत? तात्त्विकदृष्ट्या असं म्हणणं कितीही संयुक्त वगैरे वाटत असलं, तरी वास्तवाच्या वाटा वेगळ्या असतात. त्यांची वळणे प्रत्येकवेळी आकळतीलच असं नाही. समोर येणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतातच असेही नाही. सगळंसगळं करूनही पदरी निराशाच येत असेल, तर समाधानच्या तुकड्यांचा शोध कसा, कुठे घ्यावा? आयुष्याचे अर्थ आणि उत्तरे शोधावीत तरी कशी?

टोकाचा पथ निवडताना काहीच विचार जाणाऱ्याच्या मनात येत नसतील का? लेकरंबाळं, सहचारिणी अगदी काही म्हणजे काहीच डोळ्यासमोर दिसत नसेल का? परिवाराप्रती आसक्तीच्या पाशांनी मन जराही बद्ध होत नसेल का? की सगळं सगळं आठवत असेल? जीव गुंतत असेलही आस्थेच्या धाग्यात, पण आसक्तीपेक्षा टिकून राहण्याचे प्रश्न अवघड होतात, तेव्हा सगळेच पाश तटातटा तुटतात. जगण्याचे सगळे पीळ सोडून तो सुटतो. जीव तुटतो तो मागे राहणाऱ्यांचा. भोग भोगावे लागतात मागे राहिलेल्यांना. जन्मदात्या बापाची म्हातारपणी काठी व्हायचे, तर पळपुट्यासारखे पळून गेलास, म्हणून विचारत राहते ती प्रश्न त्याच्या आठवणींना. परिस्थितीपासून पलायन ही काही पराक्रमाची परिभाषा नाही होऊ शकत. पण सगळेच पर्याय संपले असतील तर... कोणाचा काळजाचा तुकडा, कोणाचा बाप, कोणाचा भाऊ, कोणाचा आणखी काही नात्याचे पाश क्षणात तोडून गेलेला असतो. आठवणींची सय घेऊन विकल डोळे वाहत राहतात सगळ्यांचे. वेदनांचा अथांग डोह गहिरा होत राहतो, पण जिने आपलं सगळं जगणं त्याच्या जगण्याशी जुळवलं, तिचं काय? त्यात फक्त भकास शुष्कपण उरतं. त्याच्या अशा अविचारी वागण्याने तिच्या काळजाला पडणारी घरे दिसत नसतीलच का कोणाला? की दाखवता येत नसतात तिला? उदासवाणा एकांत घेऊन आलेल्या क्षणांना हे कळावे कसे? प्रत्येक पळ छळत राहतो, धग बनून चटके देत राहतो तिला.

समाज नावाच्या व्यवस्थेला विशिष्ट विचारधारा असते का? असेल तर ती सर्वांप्रती सामानुभूतीची असते का? सर्वांप्रती समदर्शी भाव त्यातून प्रतीत होत असतात? ठाम विधान करणे अवघड आहे. त्यांची उत्तरे प्रासंगिक असतील. कदाचित भिन्न असतील. पण एक वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही, व्यवस्था अमूर्त असते. तिला आकारात अधिष्ठित नाही करता येत. आभासाच्या आकृत्या असतात त्या, चेहरा नसतो. समाजाच्या जगण्याचा अचूक लसावी नाही काढता येत. चार चांगले असतील, तर दोन वाईटही असतात गर्दीत. याकडे दुर्लक्ष करून नाही चालत. व्यवस्थेने उभ्या केलेल्या शेकडो किंतु-परंतुना, नजरांमधील हजारो प्रश्नांना सामोरी जात, तोंड देत ती एकटीच लढते. दैवाने दिलेल्या अंधारात हरवलेला आज पदरी घेऊन उद्याचा क्षितिजावर आस्थेचे कवडसे शोधत राहते. परिस्थितीशी दोन हात करायला तो कचरला असेल, पण त्याच्याच अंशाला असा पराभूत न होऊ देण्याचा निर्धार करते. एक लढवय्या म्हणून पाहते ती त्याच्यात. निदान त्याने तरी गलितगात्र होऊन परिस्थितीसमोर गुढगे टेकून संघर्षाची हत्यारे म्यान नयेत. पहाडाएवढे संकटे आणणाऱ्या प्रसंगांना सामोरे जात त्यांच्या नजरेत नजर घालून सांगावं, तू कर कितीही खेळ, मी खेळत राहीन उमेदीचा ओलावा अंतरी कायम ठेवून.

असेलही तिची ही केविलवाणी धडपड. पण डोळ्यातून आशेच्या ज्योती तिने मालवू दिल्या नाहीत. तेवत आहेत त्या दैवाच्या कराल आकृत्यांचा माग काढण्यासाठी. तिच्या लढाईला असतील यशापयशाची अनेक परिमाणे. पण प्रयत्नांना कुठे यशापयशाच्या परिमाणांच्या पट्ट्यात मोजता येतं? स्वयंभू अस्तित्वाला ओळख करून देण्याची आवश्यकता नसते. लढणाऱ्याने उचललेली प्रत्येक पावले योजनांची मुळाक्षरे असतात. त्याचे मायबाप झगडले, दैवाच्या प्रत्येक आघातांशी. परिस्थितीने पुढ्यात उभ्या केलेल्या वादळवाऱ्यासोबत झटत राहिले. तीच विजिगीषू प्रेरणा सोबत घेऊन ती परिस्थितीला आव्हान देते. काळाला करूदेत कितीही आघात. घालू दे रक्ताळणारे घाव. फारतर वाहत्या जखमा घेऊन राहीन उभी जीवनसंगरात, देहातून प्रतिकाराचा शेवटचा थेंब वाहून जात नाही तोपर्यंत. नियतीने केलेल्या आघातांच्या पराक्रमाच्या विजयी गाथा काळाला लिहूदेत. त्याच्या जयजयकाराचे जयघोष उमटू देत आभाळावर. निनादूदेत सगळ्या दिशा त्याच्या विकृत पराक्रमाच्या आनंदाने. पण माझा संघर्षाचा आवाज क्षितिजांचा वेध घेईल. सूर्याच्या तेजाची दाहकता नसेल माझ्या संघर्षाच्या अस्त्रांमध्ये, पण त्याच्याकडूनच घेतलेल्या उर्जस्वल प्रकाशाचे विस्मरण नाही झालं अजून. सूर्य बनून नाही लढता आलं म्हणून काय झालं, काजवा होऊन लढत राहीन. त्याच्या दाहकतेची फिकीर नाही आणि त्याच्या पराक्रमी प्रकाशाची पर्वा.

आभाळाला जाऊन सांग, कोसळ हवं तितकं. पांघर अंधाराची वस्त्रे साऱ्या चराचरावर. पण मनातला कवडसा कसा गिळशील? आधाराचा खांब मोडला असेलही, पण कणा अद्याप सलामत आहे अन् हरवलेली स्वप्ने पेरायला सोबतीला आहे काळ्या आईचा चतकोर तुकडा, जो संसाराच्या चौकटींना देईल नवं कोंदण. नसेलही प्रकाशाचा उत्सव माझ्या अंगणी साजरा होणार, पण हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने लख्ख प्रकाश शोधायचा आहे. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून आयुष्याची रोपटी पुन्हा काळ्या आईच्या कुशीत रुजवायची आहेत. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असल्या, त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनले असेलही. पण उसवलेल्या जगण्याला टाके घालण्याची उमेद अद्याप सोडली नाही. मनगटात आहे अजून ताकद दैवाला आणि देवालाही आव्हान देत उगवून येण्याची.

दैवशरण वृत्तीला त्यागून परिस्थितीच्या आघातांशी दोन हात करीत घर उभं करणारी 'ही' अभागी म्हणून हळव्या मनातला एक कोपरा थरथरतो. अंतर्यामी करुण भाव जागा होतो. परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांच्या पात्रात तिचं असणं अभागीपण असेलही, पण उन्मळून पडलेल्या आयुष्याला उभं करताना आघातांवर घाव घालून नव्याने रुजवण्याची जिद्द न सोडणारी रणरागिणी आहे ती. प्राप्त परिस्थिती स्वीकारून उन्मळून टाकणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना सामोरे जाण्याची जिद्द येथील प्रत्येक मातेचा, भगिनीचा जगण्याचा पैलू आहे. अबला म्हणून व्यवस्था तिला अधोरेखित करीत राहिली असेलही; पण प्रसंगी तीच दुर्गा होते, काली होते, हे कसे विसरता येईल? आयुष्याचे अर्थ लावतांना घडलेल्या प्रमादाच्या परिमार्जनाचा पर्याय असते ती. कोमल असेल, नाजूक असेल ती. पण प्रसंगी वज्रालाही आव्हान देण्याइतकी कठोर होऊ शकते. प्रेमाने, ममतेने, वात्सल्याने ओथंबलेले हृदय तिची ताकद नसून, खरं बळ परिस्थितीला वाकवणाऱ्या तिच्या अक्षुण्ण मनगटात असतं. देव अन् दैवही अशावेळी तिच्यासमोर खुजे वाटायला लागतात.

जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांना नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतील, असेही नाही. नाही होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात ते थकतात, हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन विखरत जातात अन् संपवून घेतात. एका प्रदक्षिणेला पूर्णविराम मिळतो, पण दुर्दैवाचे अगणित फेरे जन्माला घालून. संपणाऱ्यांप्रती हळहळ व्यक्त करणारे विकल शब्द काही दिवस वातावरणात विहार करतात. नियतीच्या क्रूर आघातातून जीवनाची अवकाळी सांगता झाल्याने हळहळ व्यक्त होते. वेदनांची ठसठस कालौपघात कमी होत जाऊन स्वभावानुरूप विस्मरणात जाते. नव्हे विसरावंच लागतं, कारण संघर्ष केल्याविन जीवनयात्रेची सफल सांगता कुणालाच करता येत नसते. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी वाटा शोधाव्या लागतात. मनाची समजूत घालत मुकाटपणे चालावं लागतं, नियतीने पुढ्यात आणून पेरलेल्या मार्गावरून. आजचा दिन जगणं मातीमोल करून गेला; पण निदान येणारा उद्या तरी आयुष्यात सफलतेचे रंग भरणारा असेल, या अपेक्षेने.

प्रश्न कालही होते. आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. मात्र त्यांचं रूप पालटलं आहे. आवश्यकता आहे, परिघाबाहेरची उत्तरे शोधण्याची. वेदनेच्या वाटेने निघालेली पावले आपल्या चौकटीत सामावून घेण्याची. उदात्त विचारांना कृतिरूप देण्याची. जगण्याचं वर्तुळ आणखी व्यापक करण्याची. कारण विश्वाच्या वर्तुळातून माणूस वजा केला तर मागे काय उरेल? या प्रश्नाचं उत्तरही एक मोठं वर्तुळ हेच असेल, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: तेहतीस

By // No comments:

झऱ्याजवळच होते राहत


झऱ्याजवळच होते राहत
पण घडे भरून
घेतलेच नाहीत
नदी तर वहात
होती शेजारूनच
काठाकाठानेच
राहिले हिंडत

पाऊस कोसळायचा
घरांभोवती
धुवांधार
आंत आंत
कोरडीच रहात गेले
कोरडीच

फुलवले फुलांचे
ताटवे सभोवती
एकही फूल नाही
माळू शकले केसांत

दवबिंदूंना राहिले गोंजारीत
पण म्हणावी अशी
भिजलेच नाहीं
भिजलेच नाहीं

साऱ्या ऋतूंनी
आपलं मानलं
माझ्याभोवती
फेर धरला सतत
मी मात्र एकाकीच
होत गेले
एकाकीच...
एकाकीच...!


प्रा. डॉ. सौ. रामकली पावस्कर

आयुष्य असा एक शब्द ज्याचा अर्थ शोधत निष्कर्षाप्रत पोहचण्यास आयुष्य अपुरे पडते. पण याचा अर्थ असा नाही की, त्याचे अर्थ शोधण्याचा प्रयास कोणी केला नाही. सृष्टीत सर्वत्र कुतूहल पेरलेलं आहे. ते वाचायचं. वेचायचं. त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी मनाच्या मातीत आकांक्षेचे अंकुर रुजवता यायला हवेत. तेवढा ओलावा अंतरी जपता यावा. समाधानाचा सांगावा घेऊन येणाऱ्या वाटा शोधता याव्यात. सुखांच्या चांदण्या मनाच्या आसमंतात पेरता आल्या की, प्रकाशाचे कवडसे साद घालू लागतात. आयुष्याला साफल्याचा गंध लाभावा, पर्याप्त समाधान अंगणी नांदते राहावे, ही स्वाभाविक कांक्षा असते. आयुष्याकडे पाहण्याच्या प्रत्येकाच्या काही धारणा असतात. काही विचार असतात. काही श्रद्धा असतात. काही गणिते, काही सूत्रे असतात. ते घेऊन उत्तरे शोधावी लागतात. शोधाला पर्यायी विकल्प नसतो. आहे ते अन् आहे तेवढंच आपलं म्हणून चालत राहावं. उपसत राहावं स्वतःच स्वतःला. शोधत राहावं प्रत्येकवेळी नव्याने आपणच आपल्याला. कुणी वणवण म्हणेलही याला. ही भ्रमंतीच जगण्याची श्रीमंती असते. हा शोधच आयुष्य असतं नाही का? जो कधी पुरा होत नाही. काही थोडं हाती लागावं. पण पुढच्याच पावलावर आणखी दुसऱ्या विभ्रमांनी खुणावत राहावं. शेवटी सगळे सुखाच्या शोधातच तर भ्रमंती करत असतात. समाधानाचे तुकडे वेचून आणण्याची आस अंतर्यामी घेऊन पळतात. ओंजळभर ओलाव्यात अंकुरत राहतात. समाधानाच्या कळ्यां साकळत जगणं सजवत राहतात. म्हणूनच की काय संत तुकाराम महाराज ‘सुख पाहता जवापाडे...’ म्हणाले असतील का? नेमकं काय असेल, असं म्हणताना त्यांच्या मनात? आयुष्यावर लोभावीन प्रीती करावी, असं काहीसं सांगायचं असेल का त्यांना? असेलही! तसाही माणूस लोभाशिवाय वेगळा असतो का?

आयुष्याच्या अनेकांनी अनेक परिभाषा केल्या. सांगितल्या. लिहिल्या. विवेचन केलं. पण त्यातील नेमकी कोणती परिपूर्ण असेल? की अद्याप तशी तयार झाली नाहीच. असेल तर ती संपूर्ण असेल का? समजा पूर्ण असती, तर माणसाला अस्वस्थ वणवण करायची आवश्यकता असती का? म्हणतात ना, पूर्णत्वाच्यापलीकडे उभे नश्वरतेचे कडे. कदाचित ही अपूर्णताच आयुष्याचे अर्थ शोधायला प्रेरित करते. अंतर्यामी चैतन्य नांदते ठेवते. तसंही आयुष्य काही सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. तसं असतं तर सगळेच आनंदाच्या झोक्यांवर झुलताना दिसले असते. कुठे अपेक्षा आहे, तर कुठे उपेक्षा. कुठे वंचना आहे. कुठे मनोभंग, तर कुठे तेजोभंग आहे. कुठे केवळ सैरभैर धावणं आहे. कुठे प्रभाव, तर कुठे अभावाचाच प्रभाव. किती खेळ खेळतं आयुष्य ओंजळभर भावनांसोबत. आयुष्य कुणाला परीक्षा वाटते. कोणाला आनंदतीर्थ. कोणाला सुखांचा शोध. कोणाला आणखी काही. कोणाला काय वाटावं, हा वैयक्तिक निवडीचा भाग. अर्थात, असं वाटण्यात वावगं काहीच नाही. कोणाला काय वाटते, म्हणून अयुष्याचे अर्थ सुगम होतातच असंही नाही.

दुपारच्या निवांत वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली कुठलंस पुस्तक वाचत विसावलो होतो. दूर कुठेतरी ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणं सुरु आहे. त्याचे बोल ऐकू येतायेत. ते ऐकून वाचनावरून लक्ष विचलित झालं अन् त्यातील शब्दांवर नकळत मन रेंगाळत राहिलं. खरंतर याआधी हे गाणं ऐकलं नाही, असं नाही. खूपवेळा ऐकलं असेल. पण कधीकधी एखादा क्षण असा येतो की, शब्दांमध्ये असणारा आशय शोधण्यापेक्षा मनातील प्रतिमांचे अर्थ आपण त्यात शोधू लागतो. शब्दांना त्यांचा स्वतःचा अर्थ असला, स्वतःचं अवकाश असलं, तरी त्यास दूर सारून मनातल्या प्रतिमांची फुलपाखरे सुरांभोवती पिंगा घालायला लागतात, शब्दांभोवती उगीचच फेर धरून विहरायला लागतात.

या गाण्यातील शब्दांचा आशय, अर्थ कोणाला काय अपेक्षित असेल, तो असो. पण त्यातल्या ‘ओझे’ शब्दावर उगीचच रेंगाळत राहिलो, मनातल्या अर्थाचं अवकाश शोधत. तसंही माणसाचा स्वभाव आपण काही करण्यापेक्षा, शक्य झाल्यास स्वाभाविकपणे एखादे काम दुसऱ्याकडून करून घेण्याचा असतो. देता आले तर कुणाच्यातरी खांद्यावर ओझे देण्याचा असतो. तसं पाहता कुठलेही ओझे काही कोणी स्वच्छेने स्वीकारीत नसतो. कारणवश ते दत्तक दिले जाते किंवा परिस्थितीवश आपले म्हणून स्वीकारावे लागते. अर्थात हा सगळा परिस्थितीचा प्रासंगिक परिपाक असतो. ओझं शब्दात लादण्याचाच भाग अधिक असतो, नाही का?  मग ते स्वतःचं असो अथवा दुसऱ्याचं. तसंही माणसं आयुष्यभर लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरत असतात. ती कधी आप्तस्वकीयांनी, कधी स्नेह्यांनी आपलेपणाने हाती दिलेली असतात. कधी व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना परिस्थितीने पुढ्यात आणून टाकलेली. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारलेली. ती टाळता येत नाहीत आणि त्यापासून दूर पळताही येत नाही. कुठली ना कुठली ओझी घेऊन आयुष्य सरकत असते पुढे, वाटेवरच्या वळणाला वळसा घालून. कुडीत श्वास असेपर्यंत ओझ्यांना घेऊन माणूस वावरत असतो. हा प्रवास त्याच्यापुरती एक शोधयात्रा असतो. आपलं असं काही शोधत तो चालत राहतो. क्रमसंगत मार्गाने पुढे सरकत राहतो. तशी ओझीसुद्धा रंग, रूप बदलत जातात. त्यांना प्रासंगिक परिमाणे लाभत असतात. नवे आयाम मिळत असतात. आपापली वर्तुळे सांभाळत माणसं आयुष्याच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार या अर्थाने मोजले जात नसले तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. इच्छा असो, वा नसो हे ओझं ओढावं लागतं. घर नावाची चौकट उभी राहते. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले पर्यायच आणखी काही अनपेक्षित ओझी आणत असतात. एका ओझ्याने निरोप घेतला की, दुसरे असतेच उभे प्रतीक्षेत. भविष्याच्या धूसर पटावरून अपेक्षांची आणखी काही ओझी आपल्या पावलांनी चालत येतात. मोठी आणि वजनदार होत जातात. जीवनाच्या जडणघडणीसाठी समाजाकडून प्रमाणित करून घेतलेल्या प्रतिष्ठेची वलये भोवती तयार होतात. हे चक्र क्रमशः चालत राहते. मनी वसतीला उतरलेलं सगळं मिळवायचं म्हणून धावाधाव करण्यास परिस्थिती बाध्य करीत असते.

बऱ्याचदा ‘तुझं आहे तुजपाशी....’ अशी अवस्था होते. सगळ्यांसाठी सगळं करावं, तर स्वतःसाठी काही शेष राहतच नाही. आसपास सजवत राहायचं, पण स्वतःला मनाच्या आरशात बघायचं राहूनच जातं. इतरांसाठी समाधानाच्या परिभाषा रेखांकित करताना स्वतःला अधोरेखित करणारी रेषा पुसट होत जाते. हे सगळं कुणासाठी आणि का करायचं? बरं केलंही काही, तर केवळ आपणच का? बाकीच्यांचे त्यांच्या, इतरांच्या आयुष्याप्रती काही म्हणजे काहीच उत्तरदायित्व नसते का? असं काहीसं वाटू लागतं. आस्थेची पाखरे मनाच्या आसमंतात विहार करायला लागतात. संदेहाचे भोवरे वाढू लागतात, तसे विचार किंतु-परंतुच्या अवांछित आवर्तात गरगरत राहतात. शोधलीच काही उत्तरे, तरी ती डहाळीवरून सुटलेल्या पानासारखी सैरभैर भिरभिरत राहतात. विचारलं स्वतःच स्वतःला, तरी त्याचं उत्तर काही हाती लागत नाही.

इतरांच्या जगण्यात रंग भरताना आयुष्यातलं इंद्रधनुष्य रंग हरवून बसतं. हरवण्यात आनंद वगैरे असतो म्हणणं कितीही उदात्त, उन्नत वगैरे वाटत असलं, तरी समर्पणाच्या परिभाषा केवळ उपदेशात सुंदर दिसतात. आचरणात आणताना त्यांच्या मर्यादा आकळतात, तेव्हा आपल्या सीमांकित असण्याचे अर्थ नव्याने आकळू लागतात. स्वतःच स्वतःपासून निखळत जाण्याच्या वेदना घेऊन ही कविता वाहत राहते, एकाकीपणाला सोबत करीत. आसपासच्या गलक्यात आपला आवाज विरघळून जावा, एक अक्षरही कुणाला ऐकू येवू नये, यासारखी ठसठस कोणती नसते. एक वाहती वेदना सोबतीला घेऊन मनाचे कंगोरे कोरत ही कविता सरकत राहते. समुद्रात पाणी तर अथांग असावं, पण पिण्यालायक थेंबही नसावा. यासारखं वेदनादायी काही असू शकत नाही. नदीतून ओंजळभर पाणी घेऊन तिलाच अर्ध्य म्हणून दान द्यावे. हाती उरलेल्या चार थेंबांना तीर्थ मानून विसर्जित होण्यात धन्यता मानावी. विसर्जनात सर्जनाची स्वप्ने दिसावी अगदी तसे.

‘स्त्री’मनातला सनातन सल घेऊन येते ही कविता. कोणीतरी केवळ ‘ती’ आहे म्हणून परार्थात परमार्थ शोधणे तिचं प्राक्तन असतं का? नियतीने तिच्या ललाटी कोरलेले अभिलेख असतात का हे? वेदनांना कुंपणे घालून इतरांच्या आयुष्याची वर्तुळे सजवण्यासाठी आखून दिलेल्या परिघाभोवती प्रदक्षिणा घालत राहणं तिचं भागधेय असतं का? कदाचित! ती आई असेल, बहीण असेल, सहचारिणी असेल किंवा आणखी कोणती नाती तिच्या असण्याने आयुष्यात आली असतील. कदाचित ती प्रियतमाही असेल. कोणीही असली, तरी तिच्या असण्याला वेढून असलेल्या वर्तुळांना विसरून तिचा प्रवास घडणे असंभव. खरंतर ही सगळीच नाती नितांत सुंदर. त्यांचे विणलेले गोफही देखणे. पण प्रत्येक धाग्यात एक अस्फूट वेदना गुंफलेली असते. आप्तांचं आयुष्य सजवताना, स्वकीयांसाठी सुखांचा शोध घेता घेता ती स्वतःचं असणंच विसरते. त्यांच्या सुखात आपल्या समाधानाचे अर्थ शोधत राहते.    
 
‘ति’च्या जगण्याची क्षितिजे समजून घेताना आयुष्याच्या पटावर पसरत जाणाऱ्या हताशेला ही कविता शब्दांकित करते. एक उसवलेपण मांडत जाते. खरंतर सुखांची परिभाषा बनून झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याजवळच राहणं घडत असलं, तरी समाधानाचा स्पर्श लाभलेले चार थेंब ओंजळीत जमा करता येतीलच असं नाही. प्रारब्धावर पलटवार करण्याचे कितीही प्रयास केले, तरी परिस्थिती परिवर्तनाच्या प्रयत्नांवर कधी प्रघातनीती प्रहार करते, कधी नियती खोडा घालते. संकेतांची कुंपणे पार करता आली की, आयुष्याच्या वाटा शोधता येतात. पण परिस्थितीने बांधलेल्या भिंती पार करण्याइतपत हाती काही नसलं, तर प्रतीक्षेशिवाय अन् प्रार्थनेशिवाय आणखी उरतेच काय? आसपासच्या परगण्याच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल पेरणाऱ्या नदीचा सहवास प्रासादिक असला. संपन्नतेचे दान पदरी घालणारा असला, सुंदरतेची परिभाषा घेऊन तो वाहत असेलही, पण केवळ काठ धरून सरकणे प्राक्तनात असेल, तर कोणत्या किनाऱ्यांनी प्रतीक्षा करावी? नदीच्या पात्रात विसावलेल्या पाण्याच्या अथांगपणाचा एकवेळ थांग घेता येईलही, पण अंतरंगाचा तळ शोधावा कसा? ज्याच्या गर्भात केवळ अन् केवळ असंख्य वणवे दडले आहेत. त्या ज्वालामुखीचे उद्रेक समजून घ्यावेत कसे? किनारे धरून घडणारा प्रवास पायाखालच्या वाटांशी सख्य साधणारा असला, तरी मुक्कामाचं ठिकाण समीप असेलच असे सांगता नाही येत.

अंतर्यामी भावनांचा कल्लोळ उभा राहतो. कल्लोळात असंख्य वादळे सामावलेली असतात. वादळाच्या गर्भात फक्त विखरणं असतं. सांधणं भावनांचा हात धरून येतं. भावनांचं ओथंबून आलेलं आभाळ अनेकदा भरून येतं, रितंही होतं; पण भिजायचं राहूनच जातं ते जातंच. आसपासचा ओलावा जपता जपता अंतर्यामी साठवलेली ओल आटत जाते. कोसळणाऱ्या धुवांधार पावसाचा हात धरून आलेला प्रवाह ओलावा घेऊन वाहत राहिला असेलही, पण त्याला मनाच्या मातीला काही भिजवता नाही आलं. खडकावर पडणाऱ्या पाण्याच्या प्राक्तनात वाहणं असतं, रुजणं नसतं. एक शुष्कपण घेऊन नांदणे असते ते. आस्थेचा ओलावा शोधणारी मुळे ओलाव्याच्या ओढीने सरकत राहतात. पण कोरडेपणाचा शाप घेऊन देहावर ओढलेल्या अगणित भेगांना सांभाळत पडलेली माती चिंब भिजण्याच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसली असेल, तर झाडांनी बहरावे कसे? अनेकांच्या आयुष्याला गंधाळलेपण यावं म्हणून फुलांचे ताटवे फुलवले, तरी पाकळीवरही आपली मालकी नसावी, यापेक्षा वंचनेचे आणखी कोणते अर्थ असू शकतात?

पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परिसरावर मोत्यांची पखरण करीत पसरलेल्या दवबिंदूंना गोंजारत राहावं, पण स्पर्श करायला हात पुढे करण्याच्या आधीच त्यांनी निखळून पडावं. सुखंही अशीच. स्वतःसाठी चार थेंब वेचावेत, पण हाती लागण्याआधीच त्यांनी विसर्जनाच्या वाटेने विसावा शोधावा. आपलेपणाची चादर पांघरून वेढून घेणारा ओलावा निसटत राहतो. काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत राहतो. ऋतू पाठशिवणीचा खेळ खेळत राहतात. कूस बदलून नव्या वळणावर विसावतात. पण त्यांच्या बहराचे अर्थ काही आकळत नाहीत. रसरंगगंधाचे किती सोहळे सोबत घेऊन आलेले असतात ते; पण  त्यांचा स्पर्श काही घडत नाही. त्यांच्या बहराने भोवती फेर धरून पिंगा घालत राहावे. त्यात समाधानाचे तुकडे वेचत राहावेत, पण हाती काही लागू नये. एकाकीपण तेवढे मूक सोबत करीत राहावे. निखळून पडावेत माळेत आस्थेने गुंफलेले एकेक मणी. घरंगळत राहावं त्यांनी, तसं आयुष्यही कधी ओवलेल्या सूत्रातून सुटते. देठातून निखळलेल्या पानाला सैरभैर होऊन वाऱ्यासोबत धावण्याशिवाय विकल्प उरतोच कुठे?

आयुष्याला अनेक ज्ञात-अज्ञात अर्थांची वलये वेढून असतात. त्याचे अर्थ अवगत करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ते शोधण्यासाठी मर्यादांची कुंपणे पार करून पायाखाली पडलेल्या वाटांनी मार्गस्थ व्हावं लागतं. चालत राहावं लागतं रस्त्यांचा शोध घेत. कधी मळलेल्या मार्गाची सोबत करीत, कधी एकाकी. माणूस चालतो आहे आपलं असं काही शोधत, जन्माला आल्यापासून. चालणं कुणाला चुकलं आहे का? चालणाऱ्यात विचारवंत होते. बुद्धिमंत होते. तत्त्ववेत्ते होते. संतमहंत होते. कोणी धांडोळा घेतला नाही आयुष्याचा? सगळ्यांनी तपासून पाहिलं आपणच आपल्याला. गवसलं का त्यांना त्याचं मर्म? आकळले का अर्थ त्यांना? असतील अथवा नसतीलही, माहीत नाही. प्रत्येकाची अनुभूती वेगळी. जशी अनुभूती, तशी अभिव्यक्ती. आयुष्य आसक्ती असते. एक असोसी असते. अर्थ तेवढे निराळे. गवसलं कुणाला काही या प्रवासात. त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलाय, आपापल्या अनुभूतीचे अध्याय हाती घेऊन. सोडवली काहींनी आयुष्याची समीकरणे, कोणी मांडली सूत्रे यशाची. म्हणून सगळ्यांनाच ते आकळेलच असंही नाही. आषाढी-कार्तिकीला वारकरी विठ्ठल भेटीची आस अंतर्यामी घेवून अनवाणी धावतात. मूर्ती म्हणून विठ्ठल एक असला, तरी प्रत्येकासाठी तो वेगळा. ज्याची जशी श्रद्धा, तसा तो त्यांना दिसतो. कुणाला काय दिसावे, कोणाला काय गवसावे, हा त्यावेळेचा साक्षात्कार असतो. आयुष्यही असेच असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: बत्तीस

By // No comments:

आरसे दिपवून टाकतात डोळे

परीक्षानळी बदलल्याने वा
कागदावरचं सूत्र मागेपुढे फिरवल्याने
रिझल्ट बदलत नसतो रासायनिक समीकरणाचा
हे पक्क ठाऊक असूनसुद्धा
आरसे चमकवले जातात विशिष्ट वेळाने
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर
अन् दिपून जातात काचबिंदू झालेले
गारगोटीगत डोळे

नितळ पाण्यात दिसावा तळ
अथवा झिरझिरीत कपड्यात
दिसावेत नटीचे योग्य उंचवटे
एवढं स्पष्ट उत्तर दिसत असूनसुद्धा
गणित अधिक किचकट केलं जातंय
दिवसेंदिवस शेतीचं

लाखो हेक्टरवर पसरलेला
हा करोडो जीवाचा कारभार
हजारो वर्षापासून जगतोय
आपल्या मूळ अस्तित्वासह
हे दुर्लक्षून दिली जातायत त्यांच्या हातात
हायब्रिड, बीटीसारखी इंग्लिश नावाची वाणं
त्यांनी कसा घालावा ताळमेळ
या ब्रँडेड बियाणांचा अन् उकिरड्यावरच्या शेणखताचा
फुगत चाललेल्या ढेरीगत वाढणाऱ्या
औषध खताच्या किमती
उठताहेत शेतकऱ्याच्या जिवावर
अन् त्यातील विषारी घटक पिकावर

धर्मभेद अन् प्रांतभेदाचं काळाकुट्ट गोंदण मिरवणाऱ्या
या देशाच्या भाळावर आता भरला जातोय
वर्गभेदाचा टिपिकल मळवट कुशलतेने
जाणते-अजाणतेपणाने शांत बसलेले असताना
मला विचारायचंय कलावंत, विचारवंतांना
त्यांच्या विचारांची दिशा

मूठभर हितसंबंधी गटाचं पडतंय प्रत्येक पाऊल
ही दरी वाढण्यासाठी
अन् गळ्यापर्यंत गडलेल्यांना
अधिक खोल गाडण्यासाठी

शेळ्या, कोंबड्या, मांजरं, म्हशी, बैल, म्हातारी, कर्ती,
कच्या-बच्याच्या एकत्रित कुटुंबापेक्षा
२+१ ची पॉलिश फॅमिली
किती इम्पोर्डेड झालीय या डिजिटल इंडियात

हा शंभर मजल्याचा टॉवर
ही नामू मांगाची झोपडी
तो पाचशे करोडचा उद्योग
तो गंगू कैकड्याचा तळ
ते इंटरनॅशनल मार्केटिंग
ती रुपयाला कप दूध विकत
आख्खी सकाळ विकणारी मथुरामाय
ते कपड्याचे, ज्वेलरीचे ब्रँड
तो सूती जडाभरडा पटका
लक्झरी गाड्यांची लॉंचिंग स्पर्धा
आठवडा बाजारात करडाचा होणारा सौदा
हे दिपवून टाकणारे वैभव
हा काळवंडून जाणारा वर्तमान
ही दरी, हा डोंगर वाढवतंय कोण?
समस्त विचारवंतांनो,
तुम्हालाच कळू शकतं या प्रश्नाचं गांभीर्य!


ईश्वरचंद्र हलगरे


प्रश्न कालही होते, तसे आजही आहेत. त्यांचा चेहरा तेवढा बदलला आहे. तसाही तो बदलतच असतो. मुखवटे प्रिय वाटायला लागले की, चेहऱ्याची तशीही फारशी नवलाई राहत नाही. कालच्या प्रश्नांची धार वेगळी होती. आजच्या प्रश्नाचे पाणी वेगळे आहे, एवढेच. प्रश्न तर कायम आहेतच. कदाचित आजचे प्रश्न टोकदार झाले असल्यामुळे अधिक बोचणारे ठरतात. काल माणसासमोर प्रगतीचे कोणते पाऊल प्रथम उचलावे, हा प्रश्न होता. आज अधोगतीपासून अंतरावर ठेवावे कसे, हा प्रश्न आहे. विसंगती घेऊन वहाणारे विचार सुसंगत मार्गाने किनारे गाठतील कसे, ही विवंचना आहे. विद्वेषाचे वणवे भडकलेले असताना सुरक्षित राहावे कसे, त्यांना थांबवावे कसे? हा प्रश्न आहे. जगाचे अन् जगण्याचे प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या साक्षीने अधिक जटिल होत आहेत. कधीकाळी खूप मोठ्ठे वाटणारे जग आज हातात सामावण्याएवढे लहान झाले आहे. स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर ते दिसते. संगणकाच्या पडद्यावर ते आलंय. पण मनावर त्याच्या सुसंगत प्रतिमा काही आकारास येत नाहीयेत. माणसांच्या मनात माणूसपण पेरावं कसं? हा खरा प्रश्न आहे.

प्रश्न आतले आहेत, तसे बाहेरचेही आहेत. त्यांच्याशी संघर्षरत राहावे लागतेच. पण तरीही एक प्रश्न उरतोच, सुरवात नेमकी करावी कोठून अन् कशी? अपर्याप्तता, अस्थिरता संयत, संथ जगण्याला मिळालेला अभिशाप असतो. अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन तो व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत राहतो. वेदनांची चिरंजीव सोबत काही टळत नाही. वांझ ओझी निमूटपणे वाहणे नियतीने लिहिलेले अभिलेख ठरत असतील, तर प्राक्तनाला दोष देऊन विचलित आयुष्यात कोणते बदल घडून येणार आहेत? काही ओझी सहजी फेकता येत नाहीत, हेच खरे. असे असले तरी अंतरी अधिवास करून असणारे आस्थेचे धागे सहजी सुटत नसतात.

परिवर्तनाला पर्याय नसतो, हे मान्य! आयुष्यात वसती करून असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून प्रगतीचे पथ नाही आखता येत हेही खरेच. काळाचे हात धरून चालत आलेल्या आभासी सुखांनी हजार स्वप्ने मनावर गोंदवली. विकल्पांच्या व्याख्या तयार करून पूर्तीसाठी पर्याय दिले गेले. आकांक्षांचा रुपेरी वर्ख लावून आयुष्याला  सजवले. साचे तयार करून सुखाच्या व्याख्या त्यात बसवल्या, पण तळापर्यंत काही पोहचता आलं नाही त्यांना. अभावाचाच प्रभाव असणाऱ्या आयुष्यात अभ्युदयाची स्वप्ने पाहत ओंजळभर सुख चतकोर अंगणी नांदते ठेवणाऱ्या वाटांचा शोध घेत वणवण करणाऱ्या पावलांना त्या काही गवसल्या नाहीत.

प्रशासकीय प्रमाद आणि राजकीय खेळांच्या हितसंबंधांनी होणाऱ्या शोषणातून सामान्यांच्या जगण्याला अधिक केविलवाणेपण येत असल्याने त्यांचे संघर्ष अधिक क्लेशदायी होत आहेत. व्यवस्थेतील साचलेपण वर्तनविपर्यासाच्या कहाण्या होतात, तेव्हा अस्मिताविहीन जगण्याचे ताण अधिक गुंतागुंतीचे होतात. भूमिहीन, बेरोजगार, बेघर, बेदखल समूहाच्या वेदना या कवितेतून दुःखाचे कढ घेऊन वाहत राहतात. परिवर्तनाला प्रगतीचे पंख लाभले; पण सामान्य माणसाची पत आणि त्याच्या जगण्याचा पोत काही प्रगतीच्या वार्ता करणाऱ्या जगाला कळलाच नाही. स्वप्ने सोबत घेऊन आलेल्या पावलांनी ओंजळभर परगणे समृद्ध झाले. पण क्षितिजांना कवेत घेणारा विशाल पट दुष्काळी आभाळासारखा रिताच राहिला. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे अनुबंध परिस्थितीच्या आघाताने तुटत आहेत. आस्थेचे प्रवाह आटत आहेत. परिवर्तनाचा हात धरून आलेल्या प्रगतीच्या परिभाषा सुखांचे निर्देशांक दाखवणाऱ्या आलेखाचे शीर्षबिंदू झाल्या, पण सामान्यांच्या मनात सजलेल्या समाधानाच्या व्याख्या काही होऊ शकल्या नाहीत. ग्लोबलच्या बेगडी वेस्टनात लोकल हरवत आहे. हरवलेपणाची सल घेऊन ही कविता एक अस्वस्थपण मनात पेरत जाते.

काळाचे संदर्भ काही असोत. त्यांच्या असण्या-नसण्याचे अर्थ तपासून पाहावे लागतात. समाधानाच्या मृगजळी व्याख्या समृद्धीची गंगा दारी आणत नसतात. समर्थपण समजून घेण्यासाठी व्यवस्थेतील विसंगतीची संगती लावता यायला हवी. कवी ही विसंगती नेमक्या शब्दांत अधोरेखित करतो. विचारांच्या साक्षीने जीवनाच्या व्याख्या करणाऱ्यांना प्रश्न विचारतो. बेगडी झगमगाटात वास्तव झाकोळले जात असेल, फसव्या प्रगतीच्या प्रखर प्रकाशझोतात वैगुण्ये दिसणार नाहीत याची नेटकी व्यवस्था केली जात असेल, तर पसरलेल्या उजेडाला आपलेपणाची किनार लाभेलच कशी? परीक्षानळीतील द्रव्य बदलून प्रयोग करता येतात, पण प्रयोगांच्या नावाने नळी बदलून नवे काही हाती येण्याची शक्यता शून्याइतकी सत्य असते. कागदावर कोरलेली विकासाची सूत्रे मागेपुढे फिरवल्याने समीकरणांच्या निकालात काही फरक पडत नसतो; पण दृष्टिभ्रम मात्र पद्धतशीरपणे पसरवता येतो. हे ठाऊक असूनसुद्धा स्वार्थाला परार्थाची लेबले लावून दिपवून टाकता येते. अर्थात, स्वप्नेही दुर्मीळ असलेल्या डोळ्यांना त्यांचंही अप्रूप वाटत असतं.

नितळ पाण्याच्या तळाशी विसावलेली वाळू, दगड सुस्पष्ट दिसावेत इतकं ठसठशीत चित्र समोर असताना संदर्भांना उगीच महात्म्याची पुटे चढवून उत्तरांच्या व्याख्या अधिक जटिल केल्या जातात. उत्तर दिसत असूनसुद्धा हेतुपूर्वक शेतीमातीचं गणित अधिक किचकट केलं जातंय. विकासाचे आराखडे आखायचे. आलेखांच्या चढत्या रेषा प्रगतीच्या रंगांनी रंगवायच्या. प्रगतीचे सोपान उभे करून आसपासचे परगणे सुजलाम सुफलाम करीत असल्याचे आश्वस्त केलं जातं. पण पुढे काय? लाखो हेक्टरवर पसरलेला करोडो जिवांचा पसारा हजारो वर्षापासून आपल्या मूळ अस्तित्वासह जगतोय. या वाटचालीत त्याने आयुष्याचे काही अर्थ शोधले, संकल्पित सुखांच्या काही व्याख्या तयार केल्या, समाधानाची काही सामायिक परिमाणे आखली. शेतीमातीचे मनोगते ज्ञात असणाऱ्यांना आतल्या आवाजाला प्रतिसाद देणे शिकवावे नाही लागत, पण बाहेरचे आवाज मोठे करून तेच आणि तेवढे वास्तव असल्याचे मनावर अंकित केले जाते, तेव्हा बहिरेपणालाही बरकत येते. प्रतिसादाचे शास्त्रीय पाठ पढवले जातात. प्राप्त परिस्थितीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून हायब्रिड, बीटीसारखी इंग्लिश वाणं आकर्षक जाहिरातींच्या वेस्टनात वेढून हाती सुपूर्द केली जातायेत. मनात संदेह उदित होऊ नयेत म्हणून झगमग प्रकाशात दिसणाऱ्या सुखांचे गारुड घालून आभासी काळजी घेण्यात कोणतेही न्यून राहू दिले जात नाही.

क्रांती वगैरे सारंसारं खरं. पण क्रांतीच्या उदरात सौख्य सामावले असेल अन् तळापर्यंत तिच्या पावलांचा वावर असेल, तर त्यात संदेह असण्याचे कारण नाही. कोणी सामाजिक क्रांतीचे योगदान अधोरेखित करते, कोणी हरितक्रांतीच्या पावलांनी चालत आलेल्या बदलांना मुखरित करतात. असे करू नये असे नाही. यांचे योगदान नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. पण विज्ञानतंत्रज्ञानाचे पंख लावून आलेल्या ब्रँडेड बियाणांचा अन् उकिरड्यावरच्या खतात शेतीचं गणित शोधणाऱ्यांनी नवी सूत्रे घेऊन आलेली समीकरणे सोडवायची कशी? परंपरेने दिलेल्या शहाणपणाचा पराभव आणि प्रगतीच्या परिभाषा घेऊन आलेल्या बदलांचा ताळमेळ घालायचा कसा? परंपरेने दिलेल्या सूत्रांवर शेतीचं अर्थशास्त्र जुळवणाऱ्या शेतकऱ्याला कशी पेलवेल यांची आकाशगामी झेप? सुखांच्या चांदण्यांनी हसणारी क्षितिजे कवेत घेण्यासाठी भरारी घेणारे पंख कोठून दत्तक आणावेत? जमिनीच्या चतकोर तुकड्याला आकांक्षांचे गगन मानणाऱ्याचे पंख कापण्याचे प्रयोग होत असतील, मातीशी सख्य साधणारी मुळंच उखडून फेकली जात असतील तर? त्याच्या आयुष्याच्या अर्थशास्त्रातून अर्थच हरवत असतील, तर जगण्याची अर्थपूर्ण संगती लावायची कशी?

समतेच्या सूत्रांचा उद्घोष करायचा. परंपरेचे किनारे धरून वाहत आलेल्या संस्कारांचा जयघोष करायचा. दीर्घ सांस्कृतिक वारसा असल्याच्या वार्ता वारंवार करीत राहायच्या. साहिष्णूपणाचे गोडवे गायचे. हे दृश्य एकीकडे, तर दुसऱ्या बाजूला दुभंगलेपण आहे ते आहेच. प्रभूची लेकरे सारी म्हणीत प्रार्थनांचे सामुहिक सूर छेडत राहायचे. समूहाची सोबत करीत छेडलेल्या सुरांचे अर्थ सापडतातच असे नाही. तो केवळ सोबतीने केलेला सोपस्कार होत असेल, तर आशयाला कोणते अर्थ राहतात? प्रार्थनांच्या निनादणाऱ्या आवाजात आयुष्याचे सूर सापडण्याऐवजी स्वरांचा साज सुटत असेल, तर जगण्याचे गाणे व्हावे कसे? आपल्या परंपराविषयी आस्था असण्यात गैर काही. त्यांचा रास्त अभिमान असण्यात काहीही वावगे नाही. पण केवळ आम्हीच श्रेष्ठ असल्याचा आग्रह किती संयुक्तिक असतो? आपणच महान वगैरे असल्याचे बेगडी अभिनिवेश घेऊन एखादा परगणा नांदतो, तेव्हा अस्वस्थपणाशिवाय हाती काय लागते? प्रत्येकाला आपल्या आणि केवळ आपल्या वर्तुळांपेक्षा अधिक काहीही नको असते, तेव्हा एकात्मता वगैरे विषय भाषणापुरते उरतात. अभिनिवेशांना आपलेपण समजण्याचा प्रमाद घडत असेल, तर ‘विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’, हे शब्द फक्त शाळेत म्हटल्या जाणाऱ्या प्रतिज्ञेपुरते उरतात.

एखाद्या गोष्टीचा वाजवी अभिमान असणे एक गोष्ट अन् निरपेक्ष भावनेने तो आचरणात आणणे दुसरी. पहिली इतकी सोपी अन् दुसरीइतकी अवघड कोणतीही नाही. भेदाच्या भिंतींची उंची वाढत असेल अन् ललाटी वर्गभेदाचा मळवट भरून रंगांना वैविध्याची लेबले लावली जात असतील, तर याला वंचनेशिवाय आणखी कोणत्या शब्दांत लिहिता येईल? विखंडीत मानसिकता घेऊन व्यर्थ वल्गना करणाऱ्यांपेक्षा विचारवंतांचे मौन अधिक क्लेशदायक असते. विचारवंतांच्या विचारांनी विश्वाला वर्तनाच्या दिशा कळतात. कळणे आणि वळणे यात असणारे अंतर पार करावे लागते. आखून दिलेल्या वाटेने चालणे सुलभ असते. अज्ञात परगण्यांचा शोध घेण्यासाठी रस्ते शोधावे लागतात. म्हणूनच कवी जाणते-अजाणतेपणाने शांत बसलेल्या विचारी माणसांना विचारतात, तुमच्या विचारांचे प्रवाह नेमके कोणते उतार धरून वाहतात? प्रगतीला परिभाषेच्या मखरात मंडित करून आखलेल्या विचारांच्या कोरीव चौकटी घेऊन मूठभर हितसंबंधी गटांचे पाऊल अंतराय निर्माण करण्यासाठी पडत असेल अन् गळ्यापर्यंत गडलेल्यांना अधिक खोल गाडण्यासाठी असेल, तर अशावेळी विचारांच्या साक्षीने विश्वाच्या कल्याणाच्या वार्ता करणाऱ्यांनी स्वस्थ राहणे कितपत संयुक्तिक असते?

एकीकडे झगमग पाहून डोळे दिपतात, तर दुसरीकडे तगमग पाहून ओलावतात. देखाव्याच्या आकर्षकपणात दुःखे दुर्लक्षित होणे, आपणच आपल्याशी केलेली प्रतारणा ठरते. झगमगाटात सगळंच सुंदर दिसतं असल्याचा भ्रम वाहतो आहे. वेगाचे पंख घेऊन सगळेच विहार करत आहेत. याहून अधिक वेग घेऊन धावायची व्यवस्था होते आहे. शेतीमाती, बैलबारदाना शब्दांचे अर्थ कोशापुरते उरलेत. सुखांच्या शोधात भटकणारी माणसे चकचकीत घरात येऊन विसावलीत. सुखांच्या चौकटी पांघरून बसलेल्या घराचं घरपण मागेच कुठेतरी राहीलं. उरले आहेत केवळ सांगाडे. त्यांना आकार आहे; पण आपलेपण घेऊन वाहणारा ओलावा कधीच आटला आहे. घराचं घरपण नांदत्या गोकुळात असायचं, हे गोकुळच विखरत आहे. सर्वसुविधांनीयुक्त घरे उभी राहिलीत. पैशाने सुखे विकत आणली, पण समाधान उसनवार आणता नाही येत. टू बीएचकेची पॉलिश फॅमिली आयात केली, पण समाधान काही कुठे उत्पादित करता येत नाही. ते अंतरंगात असते. अंतरंगातले रंगच हरवले असतील तर...

आभाळाशी गुज करणारे टॉवर तोऱ्यात उभे राहत आहेत. त्याच्या पायाशी अंग आक्रसून बसलेली नामू मांगाची झोपडी प्रगतीच्या परिभाषेत नाही बसत. तिचं असणं व्यंग वाटू लागते, आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या उंचीला. बाधा बनून बसली आहे ती. तिच्या अस्तित्वाला विसर्जित करण्याचे प्रयास इमाल्यांच्या सौंदर्याच्या परिभाषेत रास्त ठरतात. करोडो रुपये टाकून उभ्या केलेल्या उद्योगाला गंगू कैकड्याचा तळ कसा सोसवेल? शेकडो वस्तूंचा संभार अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या सुपरशॉप्स, मॉलच्या कल्चरमध्ये अॅग्रीकल्चर नाही सामावत. टॅग टाकून गोंदलेल्या किमती स्कॅन करणाऱ्या झगमग व्यवहाराला रुपयाला कपभर दूध विकण्यासाठी  सगळी सकाळ वणवण करणाऱ्या मथुरामायच्या मनातले काहूर कळेल कसे? तिची तगमग समजेलच कशी? ब्रँडेड कपड्यांचा, ज्वेलरीचा तोरा मिरवणाऱ्यांना फाटक्या कपड्यात वावरणाऱ्या विकल आकृत्या दिसत नसतात. डोळ्यांवर चढलेली ब्रँडसची चमक आसपासची लक्तरे नाही दिसू देत. आभूषणे परिधान करून नितळ अंगकांती अन् कमनीय बांधा मिरवणाऱ्या आखीव सौंदर्याच्या उन्मादाला जडाभरडा पटका पेलवणं अशक्य. लक्झरी गाड्यांच्या विक्रीचे उच्चांक करणाऱ्यांना काळजाचा तुकडा बनून संभाळलेल्या करडाचा बाजारात होणाऱ्या सौद्यातील घालमेल कशी आकळेल?

मती गुंग करून टाकणारे, डोळे दिपवून टाकणारे वैभव, त्याची आसमंतात पसरलेली आभा, हे सुखाचं चित्र एकीकडे. दुसरीकडे आयुष्य करपवून टाकणारं जगणं. क्षणक्षणाने हातातून निसटणारा वर्तमान... ही दरी, हा डोंगर वाढवतंय कोण? खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कसा वागेल, हे सांगावे कसे? जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून वावरताना नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: एकतीस

By // No comments:

शब्दांनीच निषेध केलाय मुली

शब्दांनीच निषेध केलाय मुली...
काय लिहू तुझ्यावर?
कळ्यांच्या किंकाळीसाठी,
अजून तरी नाही सापडत शब्द
चिवचिव गाणं गावं तर,
कोणत्या सुरात गाऊ?
कोणतं रोपट लावू
तुझ्या कबरीवर?

उजाड दिसताहेत धर्मस्थळे
मी फकीर...
माझ्या कटोऱ्यात आसवांचे तळे

पुरुषत्त्वाची शिसारी येतेय
मेणबत्त्या पेटवून स्वतःसकट जाळावं इंद्रियांना
आणि
माणुसकीच्या नावाने फुकट करावे चांगभलं

चल अजान होते आहे...
येतो दुवा करुन
आसिफा...
इन्नालिलाही व इन्नाराजवून...

आज तुझ्याविषयी लिहिलं
माझ्या मुलीवर असं
कुणीच लिहू नये कधीच, कोठेच!


- साहिल शेख

आयुष्य एकरेषीय कधीच नसते. त्याचे अर्थ अवगत झाले की, जगण्याची सूत्रे सापडतात. मर्यादांची कुंपणे त्याला वेढून असली तरी सद्विचारांचे साज चढवून ते सजवता येतं. समाजमान्य संकेतांची वर्तुळे आकांक्षांचा परीघ सीमित करीत असले, तरी वर्तनव्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत, म्हणून त्यावर मान्यतेची मोहर अंकित करायला लागते. नीतिसंकेतांच्या चौकटीत अधिष्ठित केलेल्या गोष्टी आखून दिलेल्या मर्यादांच्या वर्तुळातून वजा होतात, तेव्हा विवंचना वाढवतात. वर्तनव्यवहार संदेहाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहणे वर्तनविपर्यास असतो. माणूस परिस्थितीचा निर्माता असतो की, परिस्थिती माणसाला घडवते? सांगणं अवघड आहे. पण परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, एवढं मात्र नक्की.

काळच असा आहे की श्रद्धा, विश्वासाने बांधलेली मने अन् त्यांना सांधणारी स्नेहाची सूत्रे सैलावत आहेत. आयुष्याच्या बेरजा चुकत आहेत. जगण्याची समीकरणे अवघड होत आहेत. आयुष्याचे अर्थ शोधत निघालेली माणसे अडनीड वाटांकडे वळती होत आहेत. सुखांच्या व्याख्या स्वतःच्या परिघाइतक्याच सीमित झाल्या आहेत. उन्हाचे चटके झेलत नदीचे काठ कोरडे व्हावेत, तसा अंतर्यामी नांदणारा ओलावा आटत आहे. आला दिवस वणवा माथ्यावर घेऊन रखडत चालला आहे. स्नेहाचे किनारे आक्रसत आहेत. ऋतूंचे रंग उडत आहेत. संवेदनांची झाडे वठत आहेत. अवकाळी करपणं प्राक्तन झालं आहे. आकांक्षांची पाखरे सैरभैर झाली आहेत. वाऱ्याच्या हात धरून वाहणारा परिमल परगणे सोडून परागंदा होतो आहे. आयुष्याच्या सूत्रात आस्थेने ओवलेले एकेक मणी निसटून घरंगळत आहेत. जगण्याला असा कोणता शाप लागला आहे? माहीत नाही. पण जगण्याचा गुंता दिवसागणिक वाढतो आहे.

जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. येथे विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा मतलब पाहून बदलत असते. माणूस असा का वागतो? या प्रश्नांचे उत्तर अद्याप तयार झाले नाही. कदाचित पुढे जावून ते होईल याचीही खात्री नाही. संस्कारांच्या व्याख्येत तो प्रगत परिणत वगैरे असला, तरी जीवशास्त्राच्या परिभाषेत प्राणीच आहे. त्याच्यातले माणूसपण नीती, नियम, संकेतांनी बद्ध केलेलं असलं, तरी त्याच्यातलं जनावर काही त्याला आदिम प्रेरणांचा विसर पडू देत नाही. माणूस म्हणून कितीही प्रगत असला, तरी त्याच्यातला पशू स्वस्थ बसत नाही. याचा अर्थ अवनत जगण्याचं सरसकटीकरण करता येतं असं नाही. प्रमाद म्हणून एकवेळ त्यांच्याकडे पाहता येईलही; पण प्रमादाचा परामर्श पर्याप्त विचारांनी घेण्याइतके सुज्ञपण विचारांत असायला लागते. विचारांना अभिनिवेशाची लेबले लावून महात्म्याच्या परिभाषा करण्याचा प्रयास होतो, तेव्हा माणुसकीवरचा विश्वास दोलायमान व्हायला लागतो. अंधार अधिक गडद होऊ लागतो. प्रांजळपणाचा परिमल घेऊन वाहणारा विचार अस्वस्थ होतो. हे अस्वस्थपण घेऊन कवी अंतर्यामी उदित होणाऱ्या आशंकांची उत्तरे शोधत राहतो.

‘शब्दांनीच निषेध केलाय मुली’ म्हणण्याशिवाय सामान्य माणूस वेगळं करूही काय शकतो? संवेदना सगळ्या बाजूंनी तासल्या जातात, तेव्हा बोथट महात्म्याशिवाय उरतेच काय आणखी शिल्लक? आयुष्यात आगंतुकपणे आलेली अगतिकता माणूस म्हणून आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहते. सगळे विकल्प संपतात, तेव्हा हताशेशिवाय हाती काहीही शेष राहत नाही. हतबुद्धपण घेऊन येणारे कवीचे शब्द संवेदनांचे किनारे कोरत राहतात. आपणच आपल्याला खरवडत राहतात. समाजाचे व्यवहार नीतिसंमत मार्गाने चालतात, तेव्हा संदेहाला फारसा अर्थ नसतो. सत्प्रेरीत विचारांना आयुष्याचे प्रयोजन समजणाऱ्यांनी आसपास उभी केलेली नैतिकतेची लहानमोठी बेटे त्यांची उत्तरे असतात. पण मूल्यांना वळसा घालून प्रवास घडतो, तेव्हा उत्तरे काळाच्या पडद्याआड दडतात. त्याच्या विक्राळ आकृत्या तेवढ्या डोळ्यांसमोर फेर धरतात. अंधाराला चिरत चालत येतात अन् परत परत प्रश्न विचारतात, असं का घडतंय?

कोण्या मानिनीची होणारी मानखंडना माणसांनी निर्मिलेल्या मूल्यप्रणीत विचारांचा जय असू शकत नाही. माणूस एकवेळ हरला तरी चालेल, पण माणुसकी पराभूत होणं न भरून येणारं नुकसान असतं. माणूस विचारांनी वर्तला, तर माणुसकी शब्दाला अर्थाचे अनेक आयाम लाभतात. अविचारांनी वागला तर आशय हरवतात. मनात अधिवास करून असणारे विकार चांगुलपणाचं विसर्जन करतात. संस्कारांच्या कोंदणात सामावलेलं सहजपण संपवतात. ज्या प्रदेशात मानिनीच्या सामर्थ्याच्या गोष्टी अधोरेखित केल्या जातात, मातृत्वाचे सोहळे साजरे होतात, वात्सल्याचा गौरव केला जातो, पराक्रमाच्या कहाण्या सांगून सजवल्या जातात, महानतेची परिमाणे देऊन मखरात बसवले जाते, तेथे मनोभंग करणारी घटना घडते, तेव्हा पराभव संस्कृतीचं अटळ भागधेय होते. केवळ मादी म्हणून वासनांकित नजरेने तिच्याकडे बघितले जाते, तेव्हा महात्म्याचे सगळे अर्थ संपलेले असतात.

नऊ-दहा वर्षाच्या मुलीचं वाऱ्यासोबत भिरभिरायचं, झुळझुळ पाण्यासोबत वहायचं, पक्षांसोबत उडायचं, फुलपाखरासोबत बागडायचं वय. जगाच्या कुटिल कारस्थानांपासून कोसो दूर असणारं तिचं निर्व्याज जग अन् त्यातलं स्वप्नवत नितळ जगणं. पण त्या सुंदर स्वप्नांना कराल काळाची नजर लागते. आक्रीत वाट्याला येतं. आघाताने अवघं आयुष्यच क्षतविक्षत होतं. उत्क्रांतीच्या वाटेवरून चालत आलेल्या; पण पशूपासून माणूस न बनलेल्या विषारी नजरा ती केवळ मादी म्हणून अत्याचार करत असतील, तर त्याला माणुसकीच्या कोणत्या तुकड्यात मोजणार आहोत? पशूंच्या जगात मर्यादांचे उल्लंघन नसते. त्यांच्या आयुष्यात अनुनयाला अस्तित्व असलं, तरी अत्याचाराला जागा नसते. माणूस प्रगतीच्या, मूल्यांच्या, नैतिकतेच्या वार्ता वारंवार करतो. हीच असते का प्रगतीच्या वाटेने चालत आलेल्या पावलांची परिभाषा?

निरागस जिवावर घडलेल्या अत्याचाराने व्यथित झालेला कवी काय लिहू तुझ्यावर म्हणतो, तेव्हा माणुसकीच्या सगळ्या परिभाषा परास्त झालेल्या असतात. कोवळ्या कायेवर आघात होताना उठलेल्या तिच्या किंकाळीसाठी कोणते शब्द वापरावे? कळ्यांच्या उमलत्या स्वप्नांचा होणारा चुराडा मांडायला नाहीच सापडत शब्द. आयुष्याचे सगळेच सूर सुटले असतील, ताल तुटले असतील तर चिवचिव गाणं गावं कसं? हतबुद्ध मनाने कोणत्या परगण्यातून सूर शोधून आणावेत? आवाजच गलितगात्र झाला असेल, तर शब्दांना स्वरांचा साज चढेलच कसा? कोणत्या सुरात गाऊ तुझ्यासाठी? विचारणारा कवीचा प्रश्न मनात वसती करून असलेल्या संवेदनांना कोरत राहतो.

काळही क्षणभर थिजला असेल का तिच्या देहाच्या चिंध्या होताना? विकृती पाहून त्यानेही हंबरडा फोडला असेल का? कोमल मनाचे तुकडे होताना कोणत्या दिशा गहिवरून आल्या असतील? देह संपतो, पण मागे उरणाऱ्या आठवणींची रोपटी मनाच्या मातीतून कशी उखडून फेकता येतील? माणूस साऱ्या सुखांच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगणारे सगळेच धर्म का पराभूत होत असतील, विकारांनी विचलित झालेल्या परगण्यात? मांगल्याची आराधना करणारी धर्मस्थळे अविचारांच्या वावटळीत ध्वस्त होत जातात. ती नूर हरवून बसतात, तेव्हा सौंदर्याची परिमाणे संपलेली असतात. उजाडपणाचे शाप ललाटी गोंदवून घडणारी अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण त्यांचं प्राक्तन बनतं.

मी फकीर माझ्या कटोऱ्यात साचलेल्या आसवांच्या तळ्याशिवाय तुला द्यायला काही नाही म्हणताना कवीच्या मनाची अगतिकता सद्विचारांच्या पराभवाचं शल्य बनून प्रकटते. काळजाला लागलेली धग वेदना घेऊन वाहत राहते वणव्यासारखी, वारा नेईल तिकडे. माणसाच्या अंतर्यामी नांदणाऱ्या संवेदनाच पराभूत झाल्या असतील, तर कुठल्या क्षितिजांकडे सत्प्रेरीत विचारांचे दान मागावे? पुरुष म्हणून परंपरांनी मान्यता दिलेलं पुरुषत्त्व मिळालं, ही काही स्वतःची कमाई नसते. पुरुष म्हणून नियतीने काही गोष्टी पदरी घातल्या असतील, तर त्यात कसला आलाय पराक्रम? पण त्याच पुरुषत्वाच्या परिभाषा एखाद्या असहाय जिवाच्या आयुष्याची वेदना होतात, तेव्हा पुरुषपणाचा टेंभा मिरवण्यात कोणतं सौख्य सामावलेलं असतं? मेणबत्त्या पेटवून घटनांचा निषेध करता येतो, पण विरोध म्हणजे अविचारांना मिळणारा विराम नसतो. मुक्तीच्या मार्गावरून प्रवास घडावा, म्हणून प्रार्थनाही केल्या जातात. पण प्रार्थनांच्या प्रकाशात पावलापुरती वाट सापडेलच, याची शाश्वती देता येते का? प्रकाशच परागंदा झाला असेल, आयुष्यात अंधारच नाचत असेल, तर कोणत्या प्रार्थना फळास येतील?

मनाच्या मातीआड दडलेला क्रोध प्रश्न विचारात राहतो, स्वतःसकट जाळावं का इंद्रियांना आणि माणुसकीच्या नावाने फुकट करावं का चांगभलं? कवितेतून वाहणारी वेदना उद्विग्नता घेऊन पसरत जाते विकल मनाच्या प्रतलावरून. अंतर्यामी वसतीला आलेली असहायता माणुसकीच्या पराभवाच्या खुणा शोधत राहते. कुठूनतरी अजान होत असल्याचे आवाज कानी येतात. तेवढाच अंधारात एक कवडसा दिसतो आहे. त्याचा हात धरून निघालो, तर सापडतील काही उत्तरे आपणच केलेल्या आपल्या पराभवाची. मर्यादांचे परीघ घेऊन आलेल्या माणसाला प्रार्थनांशिवाय आणखी दुसरे काय करता येण्यासारखे आहे? प्रार्थनांनी जगाचे व्यवहार बदलतील की नाही, माहीत नाही. पसायदानाचे अर्थ आकळले की, चुकलेल्या पावलांना अन् भरकटलेल्या विचारांना आपलेपणाचा ओलावा लाभतो. पण संवेदनांनीच जगण्यातून काढता पाय घेतला असेल तर? आसिफा तुझ्यासाठी दुवा करुन येतो, म्हणून कवी नियंत्याच्या पदरी निवारा शोधतो. या दुवा सफल होऊन मुक्तीचे मार्ग दाखवतील, ही आस मनात अधिवास करून असते.

अभागी जिवासाठी लिहणं घडल्याची खंत कवीच्या मनात अस्वस्थपण पेरत राहते. हे लिहिण्यात काही सुखांचा शोध नव्हता. आपणच आपल्यापासून उखडत चालल्याची वेदना अजूनही तशीच वाहते आहे त्याच्या विचारातून. एक निरागस जीव अविचारांच्या वणव्यात भस्मसात झाला. उमलण्याआधीच कळी कुरतडली गेली. मातीच्या कुशीत माती होऊन कोवळा देह विसर्जित झाला. पण माणुसकीचाही पराभव झाला. माणूस म्हणून जगण्यावर अनेक प्रश्नचिन्हे अंकित झाली. हळहळ व्यक्त करण्याशिवाय काही करू शकत नाही, ही माझी अगतिकता. असं कवी म्हणतो, तेव्हा ‘पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा’ म्हणतात यावर विश्वास ठेवावा लागतो. भविष्यात माझ्या किंवा कोणाच्या मुलीवर असं कुणीच लिहू नये कधीच, कोठेच, म्हणून विश्वाचे व्यवहार नियंत्रित करणाऱ्या शक्तीकडे पदर पसरून मागण्याशिवाय सामान्य वकुब असणारा माणूस काय करू शकतो?

माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, माणसाची प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्यासाठी एकीकडे त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. त्याचे विसकटलेले रंग अजूनही माणसांना बदलता आलेले नाहीत. जगणे उसवत आहे. सामान्य माणसांनी अशा जगण्याला नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे, हे प्राक्तन होऊ पाहत आहे. नियतीने नशिबी लादलेले भोग घेऊन माणसे अस्वस्थ वणवण करीत आहेत. जग कसे आहे, कसे असावे, याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत. सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे, असंख्य प्रश्नांच्या आवर्तात गरगर फिरणारे.

कलहाने फाटलेले आणि संघर्षाने विटलेले जग सोबत घेऊन माणूस किती काळ सुखाच्या शोधात भटकणार आहे? आपलेपणाचा ओलावा आटलेलं, ओळख हरवलेल्या चेहऱ्याचं जगणं आम्ही पुढच्या पिढ्यांच्या हाती देणार आहोत का? माणूस म्हणून प्रत्येकाला अस्तित्व असणारं जगणं देण्यासाठी काहीच न करणारं जग देणार आहोत का? आरंभ, स्थिती, लय क्रमाने जिवांची जीवनयात्रा सुरु असते. देहासह नांदणारे चैतन्य एक दिवस संपते. शिल्लक काहीही उरत नाही. उरल्याच तर स्मृती. पण एखाद्याच्या जाण्याने अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावतात. अंतर्यामी अनामिक अस्वस्थता दाटून येते. ओळखीचे कोणी असेल तर माणसे हळहळतातच; पण अशीही काही माणसे असतात, ज्यांना आयुष्यात आपण कधीही पाहिले नसते. ना त्यांचा देश ठाऊक असतो, ना त्यांचे नाव-गाव ठावूक असते. त्यांचे अनपेक्षितपणे जाणे समोर येते आणि विचलित होतो. ज्याच्याजवळ वेदनांनी गहिवरणारं मन अन् सहवेदना बनून प्रकटणारी भावना आहे, डोळ्यांमध्ये आसवांचे दोन थेंब आहेत अशी माणसे अस्वस्थ होतात, हे अस्वस्थपण माणसातील माणूसपण शिल्लक असल्याचे द्योतक असते. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: तीस

By // No comments:

 
तुझं वहाणं काळाची गरज आहे

बये,
तू कुठवर वाहणार आहेस?
अजून किती दूरवर
किती दिवस...

किती पाहिलेस उंच सखल प्रदेश,
किती ओलांडलेस नवे नवे देश,
तू कुणाच्या बाजूने आहेस गं?
मातीच्या की आभाळाच्या?

तुझ्या पाण्यात कधी मातीचा गढूळ रंग आहे
तर कधी आभाळाचं निळं अंग आहे
कधी तू आईच्या दुधाची आठवण करून देतेस
कधी निर्मळ, नितळ तर कधी लख्ख होऊन जातेस

तू कधी पोटात गुळगुळीत खडे जपतेस
कधी कडेवर काळेभोर खडक घेतेस
कधी कधी वाढवतेस शंखशिंपले
कधी निर्माल्य, कधी अस्थी

कधी मासळीला वाढवता वाढवता
मासळीसम लयदार झोके घेत पुढे जातेस
कधी कधी विषारी सर्पांनाही सांभाळून नेतेस
बये,
अशी कशी, अन तू कुठे वहातेस?

तुला कुणी नदी, कुणी सरिता म्हणतं
तू स्रीलिंगी झालीयस का?
का म्हणून...?
तुला पुरुष वाचक नामही धारण करता आलं असतं?
पण नाही...

तुलाही अनेक कुळांचा उद्धार करायचा असेल
तुलाही इथला गाळ सुपीक करायचा असेल

तू वहात रहा अखंड
थांबू नकोस
हवे तर लोक बांध घालतील,
बंधारे बांधतील
धरणं बांधतील
आपापसात भांडतील
पसाभर पाण्यासाठी

तू सांडू शकतेस पाणी त्यांच्यासाठी
पण त्यांचे रक्त नाही सांडू शकत

तू कृष्णा, कोयना, गोदावरी असू शकतेस
तू भिमा, नर्मदा अथवा तू गंगाही असू शकतेस

तू असू शकतेस बारमाही अथवा हंगामी
हवं तर तू तुझा हंगामही बदलू शकतेस
पण बये तुझं वहाणं इथल्या काळाची गरज आहे

-शंकर अभिमान कसबे


‘नदी’ या एका शब्दात इहतली नांदणाऱ्या जिवांच्या आयुष्याचे सगळे अर्थ सामावलेले आहेत. संस्कृतीचे संदर्भ साकळले आहेत. परंपरांचं संचित साठलेलं आहे. नदीचा प्रवाह केवळ पाणी घेऊन वाहत नसतो. इहतली अधिवास करणाऱ्या जिवांच्या अस्तित्वाचे प्रश्नही त्यासोबत सरकत असतात. तिच्या असण्यात त्यांच्या अस्तित्वाचे अंश विसावले असतात. देहाला चैतन्य देणारी श्वासांची स्पंदने जिवांचं जगणं असलं, तरी तिच्या असण्यासोबत त्यांचं नांदणं असतं. तिचे किनारे धरून संदर्भ रुजलेले असतात संचिताचे. प्रघातनीतीच्या चौकटी तिचं पात्र धरून वाहत असतात. किती वर्षे झाली असतील, किती ऋतू आले अन् गेले असतील, परिवर्तनाचे किती तुकडे तिच्या अथांगपणात सामावले असतील, काळाचे किती विभ्रम पाहिले असतील तिने, माहीत नाही. पण सगळं सगळं सोबत घेऊन ती वाहत राहते पुढे, आपलं असं काही शोधत. तिच्या अफाट, अमर्याद असण्याला समजून घेताना हातून काहीतरी निसटतेच. अर्थात, ही माणसांची मर्यादा आहे अन् तिच्या अथांग असण्याचं तात्पर्य. तिचं असणं जिवांना जेवढं आश्वस्त करणारं, तेवढंच नसणं सैरभैर करणारं. माणसाच्या जगण्याचा इतिहास तिच्या भूगोलात सामावलेला आहे.

स्मृतीच्या पटलाआड दडलेल्या काळाचे संदर्भ कवेत घेऊन नदी वाहत असते. भविष्य तिच्या उदरात लपलेलं असतं अन् सुख वर्तमानात विसावलेलं. किनारे धरून वाहणारा प्रवाह केवळ पाणी नसतं. प्रदेशाची संस्कृती आणि तेथे अधिवास करणाऱ्या लोकांच्या सुसंस्कृतपणाला घेऊन ते वाहतं. पाण्याचा धर्म उताराच्या सोबत चालणे असला, तरी मर्यादांचे बांध घालून त्याला हव्या असलेल्या मार्गाने वळते करता येते. वळण्याचे आयाम आकळतात, त्यांना उमलण्याचे अर्थ अवगत असतात. बहराच्या परिभाषा समजून घेता येतात, त्यांना परिवर्तनाच्या संदर्भांची उकल करता येते. म्हणूनच की काय माणसाने तिला आपल्या ओंजळभर आयुष्यात अधिष्ठित केलं. तिचं अनन्यसाधारण असणं अधोरेखित केलं. जिवांचा अन् नदीचा अनुबंध ओथंबलेपण घेऊन आस्थेचे किनारे शोधत सरकत राहतो. या ओलाव्याला विलग नाही करता येत. म्हणूनच कृतज्ञ भावनेतून माणसांनी तिला मातृस्थानी अधिष्ठित केलं असेल का? मातेच्या ममतेला विशेषणांनी मंडित करता येत असलं, तरी तिच्या असण्याला अधोरेखित करणारं काहीतरी राहून जातंच. नदीच्या प्रवाहातून वाहत आलेल्या ओलाव्याला कुठल्या विशेषणांमध्ये सीमांकित नाही करता येत. तिचं असणंच मुळात अनन्यसाधारण असतं.  

जगण्याची काही सूत्रे असतात. आयुष्याची समीकरणे असतात. त्यांची उत्तरे शोधत प्रवास घडतो. प्रवासाच्या वाटा अधिक सुखकर व्हाव्यात, म्हणून माणसे कशावर तरी श्रद्धा ठेवून वर्ततात. कोणाला निसर्गाच्या अगाध सामर्थ्यात ते दिसते. कोणाला ईश्वर नाव धारण करून नांदणाऱ्या निराकारात आयुष्याचे आकार गवसतात. कोणाला आणखी काही. मनात उदित होणारी विचारांची आवर्तने त्यांचे निर्धारण करतात. विचारांमध्ये द्वैत असू शकते, आकलनाचे अन् आस्थेचे अनुबंध निराळे असू शकतात; पण पाण्याबाबत मात्र सगळ्यांची श्रद्धा एकाच प्रतलावरून प्रवाहित होते. जगाच्या कुठल्याही परगण्यात गेले तरी झरे, नद्या, विहिरी आणि तळी बहुतेक सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहेत. धर्मांनी निर्धारित केलेल्या समजूतींनी पवित्र मानली आहेत. नदी केवळ एक शब्द नसतो. तिच्याभोवती अनेकांच्या आस्था जुळलेल्या असतात. त्या सामाजिक असतील, सांस्कृतिक किंवा आणखी काही. केवळ आध्यात्मिक, धार्मिकच नाही, तर अर्थाचे आणखी काही आयाम असतात तिच्या असण्याला. अनेकांच्या अंतर्यामी उदित होणाऱ्या आकांक्षाना घेऊन ती वाहते. ती फक्त पाण्याचा प्रवाह नसते. तिच्याशी भावनिक सख्य जुळलेलं असतं.

‘गंगा’ असेल, मक्क्यामधलं ‘झमझमचं’ पवित्र जल असेल किंवा ‘दी रिव्हर जॉर्डन’ ही ख्रिश्चन धर्मात पावन मानलेली नदी. देश वेगळे असले, धर्म निराळे असले, परंपरा भिन्न असल्या, आस्थेचे रंग आगळे असले, तरी पाणी सगळ्या रंगांना आपल्याच रंगांत रंगवते, एवढं मात्र खरं. पाण्याशी असणाऱ्या अनुबंधांची अनेक कारणे शोधून सांगता येतील. काही लौकिक, काही पारलौकिक म्हणून विभागता येतील. पण त्याने आस्थेचे सगळे आयाम आकळतीलच असे नाही. प्रश्न श्रद्धेचा असतो. श्रद्धा असा परगणा आहे, ज्याची मीमांसा करणे कधी सुगम नव्हते आणि आजही आहे असे नाही. विज्ञान जेथे थांबते, तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो अन् श्रद्धा डोळस उत्तर द्यायचे थांबल्या की, त्या वाटेने अंधश्रद्धा चालत येतात. शेवटी काय, अंतर्यामी वसती करून असलेल्या अनुबंधांना सिद्ध करण्यासाठी माणसाला प्रतीके लागतात. देव, मंदिर किंवा अन्य काही असेल. काही म्हटले तरी त्याने आस्थेत काही फारसा फरक पडत नाही. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या अमूर्त संकल्पनांना भक्तीच्या चौकटीत अधिष्ठित करण्यासाठी कोरलेली ही सगळी प्रतीके. त्याचा विनियोग कोण कसा करतो, यात सगळं काही सामावलं आहे. एखाद्या बिंदूतून शक्यतांच्या अनेक रेषा जन्मतात, तेव्हा निर्णय सदसदविवेकबुद्धीने घेणे अधिक श्रेयस्कर असतं. कारण प्रत्येकाच्या काही धारणा असतात, काही धोरणे असतात. काही जमा असतात, काही खर्च असतात. त्यांची गणिते तेवढी जुळवता यायला हवीत.

गावोगावी असणारे पाण्याचे लहानमोठे स्त्रोत लोकांच्या आस्थेचे विषय आहेत. जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृती, वस्त्या नद्यांकाठी, पाण्याच्या सानिध्यात बहरल्या, हे माहीत नसणारा माणूस विरळाच. जलस्त्रोत त्याच्या जगण्याला आश्वस्त करणारा घटक आहे. त्यांच्या असण्या-नसण्याशी त्याचं आयुष्य निगडीत आहे. टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांमधे मेसोपोटॅमियाची संस्कृती वाढली. नाईल नदीकाठी इजिप्तची संस्कृती बहरली. यांगत्से आणि हुआंग नद्यांकाठी चीनची संस्कृती जन्माला आली. गंगेकाठी हडप्पा उभं राहिलं. सिंधू केवळ पाण्याचा प्रवाह नाही. त्याच्या आश्रयाने आयुष्याच्या संचिताचे संदर्भ रुजले आहेत. बहरणाऱ्या प्राक्तनाचे अभिलेख कोरले आहेत.  

बये, तू कुठवर वाहणार आहेस? अजून किती दूरवर, किती दिवस...? असा प्रश्न विचारणारा कवी आदिम बंधांना साद घालतो आहे. जगण्याच्या परिघाशी जुळलेल्या पाण्याला समजून घेत ही कविता वाहत राहते, विचारांचे तीर धरून. ऋषीचे कुळ अन् नदीचे मूळ शोधू नये असं म्हणतात; पण आपल्या अस्तित्वाची मुळं समजून घ्यायची असतील, तर स्त्रोतांच्या उगमस्थानी नांदणाऱ्या चैतन्याचा अंश समजून घेता यायला हवा. वाहत्या पाण्याला फक्त उताराच्या परिभाषा अवगत असतात. उताराने कोरलेल्या वळणांना वळसे घालत, आलिंगन देत ती धावत राहते पुढे, आणखी पुढे; संगमस्थळी पोहचून समर्पित होण्याची आस अंतर्यामी घेऊन. धावत असते, एखाद्या अभिसारिकेसारखी. किती उंचसखल प्रदेश पादाक्रांत केलेले असतात तिने. किती देशप्रदेश कवेत घेते. तिच्या वाहण्याला कोणता धर्म नाही. वाहणे हाच तिचा धर्म. कुठल्या वंशाला ती आपलं समजून घेत नाही. ना कुणाच्या बाजूने उभी राहते. ना कोणाच्या विरोधात.

मातीच्या कणातून ती पाझरते. आभाळाच्या अफाटपणाला वेढून घेते. तिच्या पाण्याला मातीचा गढूळ रंग बिलगून असतो, तसा आभाळाचा रंगही लपेटून घेते. आईच्या दुधाची सय असते ती. जपवणूक असते जिवांच्या भरण-पोषणाची. सगळं सगळं सामावून घेते आपल्या उदरात. दगडधोंडे घेते कुशीत, तेवढ्याच तन्मयतेने गुळगुळीत खडेही जपते. कधी कडेवर काळेभोर खडक घेऊन चालते. शंखशिंपले जतन करून वाढवते, तर कधी कोणी समर्पित केलेलं निर्माल्य आपल्या अथांगपणात आटवून घेते. अस्थींच्या रूपाने उरलेल्या मूठभर अस्तित्वालाही घेते आपल्या कुशीत सांभाळून. किती जिवांचा संसार तिच्या पाण्यावर तरंगत असतो. तळाशी ओंजळभर जग निर्माण करून जगत असतो. निर्व्याज जिवांना जीव लावते, तशी विषारी सापांनाही सांभाळून नेते. अमृत बनून वर्षाव करते, तशी विषही पचवून पुढे पळत राहते.

काळाची सगळी एकके घेऊन तिचं वाहणं असतं. कुठून अन् कसं? हे कागदावर आखलेल्या नकाशांच्या आकृत्यात रेषा ओढून सांगता येईलही. दाखवता येईल तिचा वळणे घेत पळणारा प्रवाह. करता येईल निर्देशित तिचा मार्ग. देता येईल एखादे नाव, ओळख म्हणून. म्हणेल कोणी आणखी काही. अर्थपूर्ण किंवा अगत्यपूर्वक. कुणी नदी म्हणतं, कुणी सरिता आणखी कुणी काही. तिचं स्रीलिंगी असणं ममतेचा स्पर्श घेऊन येतं. तिच्या असण्याचे सगळे संदर्भ वात्सल्याच्या वर्तुळात ऐकवटतात. तिच्या ‘ती’ असण्यात वेदनांचे वेद सामावले आहेत. स्वतः आटत राहते, पण आसपासच्या परगण्यांच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल पेरून जाते. खरंतर एखादं पुरुषवाचक नामही धारण करता आलं असतं तिला. पण वात्सल्याचे स्त्रोत बनून झरणाऱ्या प्रवाहाला ममतेच्या वर्तुळात अधिष्ठित करता आले असते? कदाचित नाही. तिला एकाच वेळी आई अन् बाप होता येतं. पण बापाला आई होणं अवघड असतं. ममतेचे, वात्सल्याचे वाहते स्त्रोत कोमल भावनांच्या उदरातून जन्माला येतात. कदाचित कुळांचा उद्धार करण्यासाठीच स्त्रवत राहिले असतील ते ममतेचे तुषार बनून तिच्या प्रवाहातून. तिला करायचे असतील इथल्या प्रदेशाचे चतकोर तुकडे सुपीक वगैरे. म्हणून ती वाहत असेल का?

मर्यादांचे बांध घालून तिच्या वाहण्याला नियंत्रित करता येतं, बंधारे बांधून अडवताही येतं, आभाळाशी स्पर्धा करू पाहणारी धरणं उभी करून तिच्या मुक्त विहाराला सीमांकित करणंही काही अवघड नसतं. तीही आपलं अंग आक्रसून घेत आज्ञेत रहाते. कधी ओंजळभर पाण्यासाठी लोकांचे अहं जागे होतात. पाण्यासारखं रक्त वाहतं. प्रत्येकाला स्वार्थ तेवढे सापडतात. रोहिणीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोळी हाती शस्त्र धारण करून परस्परांच्या विरोधात उभे राहतात. सिंधूच्या पाण्यात वाटपावरून कलहाचे शिंतोडे उडत राहतात. ब्रह्मपुत्राचं पाणी समूहांच्या अस्मिता टोकदार करणाऱ्या संघर्षाचे कारण असू शकतं. केवळ देशाच्या सीमाच नाही, तर पाणीप्रश्न अस्वस्थतेचे कारण बनतो. हंडाभर पाण्यासाठी घडणारी मैलोनमैल पायपीट अन् कळशीभर पाण्यासाठी होणारी भांडणे; पाण्याचं नसणं किती तापदायी असतं याचं प्रत्यंतर असतं. ओंजळभर पाण्यासाठी जिवावर उठणाऱ्या माणसांसाठी नदी पाणी सांडू शकते, पण रक्त नाही. पृथ्वीचं अस्तित्व पाण्याच्या प्रवाहांनी सजलं आहे. निसर्गाने पृथ्वीला बहाल केलेली देणगी आहे ते. पाण्यासाठी युद्धं झाली आहेत, आणि पुढेही संहार होण्याची शक्यता कुठे नाकारता येते? पाण्याला अस्मितेचे आयाम लाभायला अनेक कारणे आहेत. वर्तमानाच्या वर्तुळात ते विसावलेले असतात. ते ऐतिहासिक असू शकतात अथवा पौराणिकही. पाणी अरत्र, परत्र, सर्वत्र असतं. सजीवांचा देह पाण्याच्या आश्रयानेच तर सुखनैव नांदता असतो.  

ती कृष्णा, कोयना, गोदावरी असू शकते. भिमा, नर्मदा अथवा गंगाही असू शकते. किंवा थेम्स, टेनेसी, ड्यूनॅब, मिसिसिपी, कांगो किंवा आणखी काही असू शकते. कोणतंही नाव धारण करून वाहत असली, तरी तिचं असणं जिवांची आवश्यकता आहे. ती बारमाही दुथडी भरून वाहणारी असेल अथवा हंगामी. तिच्या असण्याशी आयुष्याचे हंगाम जुळलेले असतात. बहरण्याचे ऋतू एकवटलेले असतात, तिच्या भरलेल्या पात्रात. आयुष्य बांधलं गेलंय तिच्या असण्याशी. जगणं प्रवाहित ठेवायचं असेल, तर तिचं वाहत राहणं गरजेचं आहे. अनिवार्य आवश्यकता आहे ती आयुष्याची. काळाचे लहानमोठे तुकडे दिमतीला घेऊन जीव झगडत असतात. कलह असतो तो टिकून राहण्याचा. पाणी केवळ पदार्थ नसतो, जीवन असते जिवांचे. आयुष्याचे अर्थ वाहतात त्याच्यातून. ओंजळभर पाण्याच्या स्पर्शाने सगळेच जीव आश्वस्त होतात. शुष्क पडलेलं पात्र पाहून विचलित होतात. विस्ताराची वर्तुळे सीमित करणारी कुंपणे वेढून असतात जगण्याला. काळाच्या मर्यादांचे बांध पडतात सगळ्यांनाच. पण नदीला मर्यादा पडल्या तर... मर्यादांचे अर्थच संपतील, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: एकोणतीस

By // No comments:

दावण

पेरणीच्या ऐन मोक्याच्या क्षणी
नसायचे पैसे जेव्हा
बि-बियाणांसाठी बापाकडे
तवा बाप हताश होवून
डोकावायचा नकळत
मोठया आशेने गुरांच्या गोठ्यात

त्याचा काळवंडलेला चेहराच
सांगायचा कहाणी एकेक
नि:शब्द गुरांना
त्यांना उमगायचं होष्यमान
बापाच्या फाटक्या जिंदगानीचं

घरात खायला दाणा
नसला तरी चालेल
पण गोठ्यात दावण
भरगच्च भरलेली पाहिजे
अशी त्याची दांडगी धारणा

पोटाची भक्की
खोलवर गेलेली गुरे
द्यायचीत बापाला धीर
व्हायचीत अस्वस्थ,
तर कधी गंभीर
नड भागवली पाहिजे
हे त्यांना जणू ठाऊकच

डोळ्यातली आसवं रोखून
बाप कुरवाळायचा गुरांना
फिरवायचा हात मायेने
त्यांच्या अंगाखांद्यावरून
चालायचा संवाद त्यांचा मनोमन
तेव्हा त्यांचेही डोळे
पाझरायचीत हळूहळू

तशी एकेक नड जेव्हा
वाढतच गेली वावराची
एखादया रोग्याच्या रोगासारखी
तसं एकेक जनावर
हद्दपार होत गेलं गोठ्यातून
कधी सावकाराच्या खुंटयाला
कधी खाटीकाच्या वेशीला
तर कधी दलालीच्या बाजारात

नड तेव्हाही भागत नव्हती
ती आताही भागत नाही
सावट संकटाचं अजून
सावरायचं थांबत नाही
अशा वेळी बाप
पाहतो पाणावलेल्या डोळयांनी
परत गोठयाकडे...

तेव्हा
दिसतोय रिता रिता
आस्तित्व गमावलेला
नुसताच चौकोनी आकाराचा
गोठयाचा सांगाडा

तेव्हा
दिसतेय कुठेतरी
लटकलेली वेडीवाकडी
गुरांची रिकामी दावण...


सचिन शिंदे
••

जगण्याची काही सुनियोजित सूत्रे असतात? की जगणं आयुष्याचे किनारे धरून स्वाभाविकपणे वाहत राहते, नियतीने कोरलेल्या उतारांच्या संगतीने? माहीत नाही. पण आयुष्याला प्रयोजने असतात. नसली तर शोधावी लागतात. शोधून नसतील सापडत, तर निर्माण करायला लागतात. आयुष्याला लागलेले आसक्तीचे रंग काही सहजी नाही सुटत. रंगात रंगवून घ्यावं लागतं आपणच आपल्याला. काहीना सापडतात ओंजळभर थेंब. काहींच्या हातून निसटून जातात पाऱ्यासारखे. कधी वंचना पदरी पडते. कधी उपेक्षेचे अध्याय समजून घ्यावे लागतात. जीवनग्रंथाची एकेक पाने उलटत भविष्याच्या पडद्यापलीकडे दडलेली अक्षरे वाचायला लागतात. जगणं काही योगायोग नसतो. योजनापूर्वक साधलेला कर्मयोग असतो तो. ते सहजसाध्य असतं, तर संघर्षाला काही अर्थ राहिले असते का? नियतीने अंथरलेल्या वाटांनी जीवनाचा धांडोळा घेत धावावे लागते. धावणं काही कुणाला चुकलं आहे असं नाही. काहीच्या आयुष्याची नियती झाडाझडती घेत असते. काही झडून जातात परिस्थितीने पेटवलेल्या वणव्यात. कधीकधी प्रसंगच असे काही समोर उभे ठाकतात की, त्यांना भिडूनही हाती फारसे काही नाही लागत. शोधूनही विकल्प नाही सापडत. पलायनाचा पथ समोर दिसत असला, तरी पळून जाण्यात पराक्रम नसतो, आयुष्याचे सार्थक नसते अन् हीच जाणीव माणसाला अनेक आघातांना पचवून उभं राहायला शिकवते.

नियती कोणाच्या पदरी कोणते दान टाकेल, हे काही कोणाला सांगता येत नाही. काहींच्या जगण्यात आनंदाचे मळे बहरलेले असतात. काहींच्या आयुष्याचे ऋतू उजाड झालेले. ओसाडपण नकोशी सोबत करीत राहते. एक ऋतू पदरी वंचना घालून गेला, म्हणून प्रतीक्षेचे मोसम संपतातच असे नाही. आसक्ती कूस बदलून येणाऱ्या ऋतूंची प्रतीक्षा करायला लावते. आयुष्याला आस्थेचे अनुबंध चिकटलेले असतात. ते सहजी नाही सुटत. खरवडून नाही काढता येत त्यांना. त्यांना सोडून जगणं नाही घडत. त्यांच्या सोबतीने चालणे घडते. पायाखाली वाटा अंथरलेल्या असल्या, तरी मुक्कामाची ठिकाणे गाठण्यासाठी अनभिज्ञ दिशांचा शोध घ्यावाच लागतो. संसार सारासार विवेकाची सूत्रे घेऊन सजवायचा असतो. एकवेळ सुखाची सूत्रे शोधता येतील; पण समाधानाची समीकरणे सोडवणे अवघड. पर्याप्त समाधानाची परिभाषा अद्याप तयार झाली नाही. समाधानाच्या नांदत्या प्रदेशांकडे पोहचण्यासाठी स्नेह साकव बांधायला लागतात. पण स्नेहाचे संदर्भच सुटले असतील, तर कोणत्या क्षितिजांकडे आस्थेने बघावे?

जगाचे दैनंदिन व्यवहार नियत मार्गाने सरू असतात. त्यांच्या पासून विलग कसे होता येईल? व्यवस्थेने प्रत्येकाच्या विस्ताराचे परीघ तयार करून घेतले असतात. काहींच्या वाट्याला आकांक्षांचे गगन आंदण म्हणून आलेले असते. आयुष्याच्या वर्तुळाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा काहींच्या जीवनसाफल्याच्या सीमांकित परिभाषा ठरतात. प्रत्येकाच्या डोळ्यात लहानमोठी स्वप्ने सजलेली असतात. त्यांच्या असण्याशी त्याचे अनुबंध जुळलेले असतात. त्यांचा सहवास सुखावणारा असतो. उगवणारा प्रत्येक दिवस नवे आव्हान घेऊन इहतली अवतीर्ण होत असतो. कोणाच्या झोळीत काय पडेल, हे सांगता येत नाही इतकेच. काहींना सर्वच, तर काहींना काहीच नसण्यातली विसंगती पावलोपावली प्रत्ययास येते. काहींनी सर्वत्र असायचं, काहींनी कुठेच नसायचं, हा वर्तन विपर्यास नाही का? विपर्यासाच्या साच्यात ओतलेल्या आयुष्याच्या चौकटी जगण्याचा परीघ सीमित करतात. आकांक्षांच्या गगनात विहार करणारी स्वप्ने स्नेहाचे सदन शोधत राहतात. ती अस्वस्थ वणवण असते आपणच आपल्याला शोधण्याची. जीवनग्रंथाच्या पानांवर अंकित झालेल्या अक्षरांचे अर्थ शोधत राहतो कुणी. कुणी कोरत राहतो आकांक्षांचे आकार धारण करणारे शब्द. ज्यांच्या आयुष्यातून आशयच हरवला आहे, त्यांच्या जगण्याचे अर्थ हरवतात. अंकित झालेलं प्रत्येक वाक्य अर्थहीन कवायत बनते.

व्यवस्थेच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करून कोणी उपेक्षित राहत असेल, तर याला जगण्याची संगती म्हणावे कसे? व्यवस्थेतील विसंगतीवर ही कविता भाष्य करते. बदलत्या काळाची परिमाणे हाती धारण करून चालत आलेल्या विकासाच्या वार्तांनी मनाला क्षणभर मोह पडतो. आपल्या अभ्युदयाच्या धूसर खुणा त्यात दिसू लागतात. अर्थव्यवस्थेच्या वर्धिष्णू आलेखाच्या रेषा आयुष्याच्या प्राक्तन रेखा वाटायला लागतात. व्यवस्थेच्या वर्तुळात विकास वगैरेही झाला. रेखांकित केलेल्या वर्तुळांचे परीघ विस्तारले. त्याला नाकारण्याचे कुठलेही प्रयोजन नाही, पण सामान्य वकुब असणाऱ्यांच्या दारी दस्तक देऊन तो विसावला का? हा प्रश्न संदेहाच्या वर्तुळात प्रदक्षिणा करीत राहतो. कुणी तुपाशी अन् कुणी उपाशी असणं, ही काही समत्वदर्शी विकासाची परिभाषा नाही होऊ शकत.  

आकाशात जमा होणाऱ्या ढगांचा अदमास घेत शेतकरी प्रत्येक वर्षी आपल्या पदरी पडलेल्या दानाचे अंदाज बांधत राहतो. स्वप्ने पाहतो. गेला हंगाम वंचनेचे अध्याय आयुष्यात लेखांकित करून गेला. निदान पुढे तसे होणार नाही म्हणून आस लावून असतो. यंदाचा हंगाम कसा असेल, याचे काही आडाखे बांधले जातात. स्वप्ने समाधानच्या पावलांनी मनाभोवती फेर धरू लागतात. समृद्धीचे माप पदरी टाकण्यासाठी घराकडे निघालेल्या लक्ष्मीच्या पावलांकडे राबणारे डोळे लागलेले असतात. निदान वर्षभर जगण्याएवढी संपन्नता दारी येत असल्याचा आनंद मनात मोहरलेपण घेऊन फुलत असतो. मनी वसतीला उतरलेली स्वप्ने मातीच्या कुशीत रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट फळाला येण्याची खात्री असते. मनाला कुरतडत रहाणारं कर्ज उतरवून घ्यायचं असतं. उरलेच चार पैसे गाठीला अधिक, तर मुलामुलींचं लग्न उरकून घ्यायचं असतं. नसेल हे जमत तर चार खणांच्या घराचं थोडं का होईना, रूप पालटता आले तर घ्यावे पालटून असा विचार मनात घर करीत असतो. कारभारणीसोबत संसाराच्या सुखवार्ता करण्यात कारभारी विसावलेला असतो. स्वप्नांना भरलेले रंग आस्थेच्या क्षणांना घनगर्द करीत असतात. अंतरंगातून उमलणाऱ्या भावनांना संवेदनेचा मोहर यायला लागतो. स्वप्नांमध्ये रममाण होऊन उमेद बांधत असतो आणि... एक दिवस सारं होत्याचं नव्हतं होतं. हातातोंडाशी आलेला घास दैवाच्या खेळाने विखरून जातो.

मनात साकळलेली इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. स्वप्नांचा असा अचानक चुराडा होताना तगमग तीव्र होत जाते. जगण्याला काळाची नजर लागते. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो आयुष्याला व्यापून टाकणारा हताशेचा भयाण अंधार. हरवलेली स्वप्ने घेऊन अंधारवाटेने चालायचे असते, आशेच्या किरणाच्या शोधात. हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने प्रकाश पेरायचा असतो त्याला. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून पुन्हा काळ्या आईच्या कुशीत रुजवायची असतात. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असतात. त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनते. उसवलेल्या जगण्याला टाके घालण्यासाठी तो उभा राहतो. दैवाला आणि देवालाही आव्हान देत.

संवेदनांच्या किनाऱ्यावर उभे राहून वेदनेचे अर्थ आकळत नसतात. वंचनेचे अध्याय वाचता येतात, त्याला वेदनांचे अर्थ वेचता येतात. रोजचं मरण काय असतं, हे उपेक्षेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडल्याशिवाय कळेल कसे? विखंडीत स्वप्नांचे प्रदेश वसवणे सोपे नसते. विखरत जाण्याच्या वेदना सांगून समजतातच असेही नाही. तुटत जाणाऱ्या आयुष्याच्या तुकड्यांना सांधण्यासाठी कोणते धागे हाती घ्यावेत? आयुष्यच बेभरोशाचं झालं असेल, तर विश्वास ठेवावा तरी कुणावर? नसलेच कोणते विकल्प हाती, तर स्वतःला पणाला लावण्याशिवाय उरतेच काय शिल्लक? प्रत्येक वर्षी बाप आयुष्याशी झटत नियतीसोबत जुगार खेळतो. उगवून येण्याची आस मनात कायम ठेऊन असतो. लढूनही रिकाम्या ओंजळी उरण्याची वेदना घेऊन कविता संवेदनांचे काठ कोरत राहते. एक अस्वस्थपण घेऊन वाहत राहते, मनाच्या प्रतलावरून. उसवलेपण घेऊन आयुष्याचे अर्थ शोधत वावरणारा बाप प्रातिनिधिक मानला, तरी तो काही अपवाद नाही. नियतीने ललाटी लेखांकित केलेल्या प्राक्तनाशी झगडणारा बाप आसपास नजर वळवली, तरी कोणत्याही परगण्यात सहज दृष्टीस पडेल. त्याची नावे, वसतीची ठिकाणे तेवढी बदलतात; पण अंतरी पेटलेल्या वणव्याची दाहकता तीच. वेदनांच्या वाहत्या जखमाही तशाच अन् संघर्षही सारखाच.  

गुरावासरांनी आबाद गोठा अन् गोठ्याशी जुळलेले जगण्याचे अनुबंध आकळण्यासाठी अंतर्यामी आस्थेने ओथंबलेलं आभाळ वसतीला असायला लागतं. तो केवळ स्वार्थपूरित व्यवहाराचा परिपाक नसतो. गोठ्यात निवाऱ्याला असणारे जीव केवळ प्राणी नसतात बापासाठी. जीव गुंतला असतो त्यांच्यात. सुख-दुःखाचे सवंगडी असतात ते एकमेकांचे. नात्यांची लेबले लावून त्यांना अधोरेखित करता येत नसेल. पण कधी कधी तेच त्याचे मायबाप, बहीणभाऊ, सगेसोयरे होतात. भलेही त्यांना बोलता येत नसेल. प्रगतीच्या परिभाषा नसतील अवगत त्यांना; पण अनुबंधांचे आयाम आकळलेले असतात, असं म्हणणं अतिशयोक्त असलं तरी असंभव नाही. नेमक्या याच नात्याला घेऊन ही कविता मनात एक अस्वस्थपण पेरत जाते. बापाचं आणि मुक्या जित्राबांचं हे जगणं कोणत्या व्याख्या सांगून मांडता नाही येत. ‘जावे त्याच्या वंशा’ असं का म्हणतात, ते अनुभवावे लागते. बापासाठी ही जनावरे केवळ चार पायाचे प्राणी नाहीत. त्याच्या आयुष्याच्या आभाळाला चारही दिशांनी आपल्या माथ्यावर पेलून धरणारे खांब आहेत.
 
अडीनडीला धावून येणारे हे जीव केवळ जीव लावत नाहीत, तर जीव ओततात धन्यासाठी. शेतकऱ्याच्या जगण्यात पेरणीचे ऐन मोक्याचे क्षण अनेक प्रश्नांचे आवर्त उभे करणारे. पडत्या पावसाच्या साक्षीने हे क्षण वेचता आले की, आयुष्यातल्या संकल्पित सुखांचे संदर्भ वाचता येतात. पण प्रत्येकवेळी ते वेचता येतातच असं नाही. केवळ हाती पैसा नसल्याने पडणाऱ्या पाण्यासोबत स्वप्ने वाहून जातांना पाहण्याच्या भळभळत्या जखमा ठसठस ठेऊन जातात. अशावेळी हताशेशिवाय हाती उरतेच काय? काळजाला चरे पाडणारं दुःख सांगायचं तरी कुणाला? जगण्यासाठी भटकंती आणि कर्जासाठी भिक्षांदेही, हे प्रत्येक हंगामाआधी दिसणारं दृश्य. बापाकडे बी-बियाणांसाठी पैसे नसतात, तेव्हा मोठया आशेने गुरांच्या गोठ्यात डोकावतो. त्याच्या विवंचनेची उत्तरे कदाचित तेथे विसावलेली असतात. त्याचा काळवंडलेला चेहरा प्रारब्धाच्या एकेक कहाण्या सांगतो. गुरांनाही त्याच्या आयुष्यात प्राक्तनाने पेरलेले अभावाचे अध्याय दिसतात. उमगतं त्यांना त्याचं भविष्य. अवघं आयुष्य फाटकेपण पांघरून आलेलं. जिंदगीचे सगळे धागे विसकटलेले. एक ठिगळ लावायचं तर दुसऱ्या जागी उसवणं. ज्याचं जीवनच निराशेच्या आवर्तात आवरलं गेलं, त्याला सावरायचं कसं?
 
घरात खायला दाणा नसला तरी चालेल, पण गोठ्यात दावण भरगच्च भरलेली पाहिजे या धारणेने जगणारा बाप जित्राबांना जीव लावतो. आपलं पोट भरायची मारामार, तेथे या जिवांना जगवायचं कसं? याची टोचणी मनाला लागलेली. त्यांच्या पोटाची खळगी पुरेशा चाऱ्याअभावी हातभर खोल गेलेली. पण ही उपाशी गुरेच त्याला धीर देतात. तीही त्याच्या वेदनांना पाहून अस्वस्थ होतात. घरात उभी राहिलेली नड भागवली पाहिजे, हे त्यांना जणू ठाऊकच असतं. डोळ्यातली आसवं रोखून बाप कुरवाळतो त्यांना, फिरवतो हात मायेने त्यांच्या अंगाखांद्यावरून. कितीतरी वेळ हा मूक संवाद चालेला असतो त्यांचा मनोमन. डोळे झरू लागतात. जगण्याच्या वेदना निथळू लागतात थेंब बनून. पाझरत राहतात अभावाचे एकेक कढ.

अडचणी त्याच्या पाचवीलाच पूजलेल्या. एकाचं उत्तर शोधावं, तर आणखी दहा प्रश्न समोर उभे. वावराची एकेक नड असाध्य रोगासारखी वाढतच जाणारी. त्यावर शेवटचा पर्याय म्हणून एकेक जनावर हद्दपार होत जातं गोठ्यातून. त्यांना निरोप देताना होणारी बापाच्या मनाची घालमेल यंत्राच्या चाकांमध्ये गुंतलेल्या वेगाला कळावी कशी? हरवत जातात नजरेतून अन् ढकलली जातात डबडबलेल्या डोळ्यांनी कधी सावकाराच्या खुंटयाला, कधी खाटिकाच्या वेशीला, तर कधी दलालीच्या बाजारात. घरासाठी गोठा सोडून जाणाऱ्या जिवांच्या जाण्याने नड भागली असे अपवादानेही घडलं नाही. तशी आताही भागत नाही. संकटाचं सावट सावरायचं काही नाव घेत नाही. थांबत नाहीत दैवाने मांडलेले खेळ. नियती हाती सूत्रे घेऊन खेळत राहते. बाप पाणावलेल्या डोळयांनी गोठयाकडे पाहत राहतो. रिकाम्या गव्हाणी सोबत घेऊन पडलेला, आस्तित्व गमावलेला, हंबरणं हरवलेला नुसताच चौकोनी आकाराचा त्याचा सांगाडा तेवढा शिल्लक उरलेला असतो. गजबजलेलं गाव कधीच उठून गेलं असतं. मागे उरतात फक्त ओसाड खुणा. जनावरांच्या गळ्यात कधीकाळी विसावलेल्या दावणीचे दोर कुठेतरी वेडेवाकडे लटकलेले आठवणींचे कढ घेऊन.

जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांनाच नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. यात सगळेच उत्तीर्ण होतील, असं नाही. नाही उत्तीर्ण होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात थकतात, ते हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन विखरतात. नियतीच्या खेळलेल्या खेळाने जगण्याला अवकळा येते. आयुष्याचा बहर जाळणारा वणवा वाढत राहतो. त्याच्या दाहकतेत जगणं करपून जातं. तरीही काळाचे किनारे धरून वाहावे लागते. काही गोष्टी विस्मरणाच्या अंधाऱ्या कोशात विसावतात. विस्मृतीची वसने परिधान करून काळाचे हात धरून निघून जातात. पण आसक्ती काही सहजी टाकून नाही देता येत. नव्याने साज चढवावे लागतात आयुष्याला. जीवनगीत गाणारे सूर शोधावे लागतात. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी माणसं मुकाटपणे चालतात. मनाचीच समजूत घालतात. आजचा दिन आयुष्य मातीमोल करून गेला म्हणून काय झालं. निदान येणारा दिवस तरी जीवनात सफलतेचे रंग भरणारा असेल. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: अठ्ठावीस

By // No comments:

देऊळ

बाई, तुम्ही माझ्या
वाकड्या तिकड्या अक्षरांना
कधी हसला नाहीत
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना,
मी दिलेल्या मोडक्या तोडक्या उत्तरांवर
कधी रागावलाही नाहीत!

शाळेत, उपाशी पोटात
मिळलं ते ढकललं हावरटासारखं
म्हणून कधी मला झिडकारलं नाही
अन् जमलं तसाच केला कसाबसा अभ्यास
म्हणून कधी मला फटकारलं नाही

नाही घातला कधी कोलदांडा
नाही घातली कधी कपाळाला आठी
नाही घेतली कधी हातात काठी
उलट... उलट या पाखरावर
तुम्ही झाडासारखी मायाच केली भरभरून!

बाई, शिकण्यातलं शहाणपण
नाही आलं मला,
पण तुमच्या मायेतून
पंखात नवं बळ आलं
सबंध आकाश पेलण्याचं!

बाई, आता खूप वर्षांनंतर,
ती पडकी शाळा पाहतो मी येता जाता-
तेव्हा तुमची आठवण येते
अन् क्षणात त्या पडक्या शाळेचं,
देऊळ होऊन जातं

एकनाथ आव्हाड

शाळा एक भावकाव्य असतं, जीवनाने जीवनासाठी लिहिलेलं. त्याचे आयाम कळतात, त्याला आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी अन्यत्र आपलेपणाचे अनुबंध शोधायला लागत नाहीत. अंतर्यामी असणाऱ्या आस्थेतून ते आकारास येतात. ‘शाळा’ असा एक शब्द आहे, जो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जगण्याशी जुळलेला असतो. निमित्त काहीही असो, सुजाण होण्याची एक वाट शाळेच्या दिशेने वळते एवढं नक्की. शाळा शब्दासोबत अभ्यास, परीक्षा, पुस्तक, शिक्षक आणि शिकणं एवढंच चित्र उभं राहत नाही. शाळा नाव धारण करून एक प्रतिमा मनाच्या प्रतलावर प्रकटते. शाळा, शिक्षक आणि शिक्षण हे परस्पर पूरक शब्द. यांच्या साहचर्यातून जगण्याचं आभाळ समृद्ध करणारी व्यवस्था उभी राहते. शिकविण्याचं शाळा एक साधन आहे, भलेही ते एकमेव नसेल. अफाट, अमर्याद नभांगणाखाली माणूस स्वतःही शिकू शकतो, ती स्वयंसाधना असते. अन्य जिवांना औपचारिक शिक्षण देण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात; पण माणसांना घडवावं लागतं. मनी वसणाऱ्या कुतूहल, जिज्ञासापूर्तीसाठी निश्चित दिशा द्यावी लागते. ती शिक्षणातून गवसते.

माणसाच्या आयुष्याचे चक्र भविष्याभोवती गरगर फिरत असतं. फिरायलाही हवं. कारण आजच्या प्रयत्नातून पुढच्या प्रवासाचे पथ आकारास येत असतात. आनंदप्राप्तीसाठीच तर माणसाची सारी धडपड चालेली असते. आनंदयात्रिक बनण्यासाठी आधी आनंदाचं झाड आपल्या अंगणात लावावं लागतं. पण यातील किती झाडं बहरतात, फुलतात? परीक्षेत मिळवलेल्या गुणांपेक्षा जगण्याच्या गुणवत्तेचं मोल अधिक असतं. ते टक्केवारीत कसं होईल? किती गुण मिळाले, असं विवक्षित वेळ निघून गेल्यानंतर कोणीच कोणाला विचारत नाही. मिळवलेले गुण दिसावेत म्हणून काही कोणी गुणपत्रक गळ्यात घालून वावरत नाही. परीक्षेतील गुण महत्त्वाचेच, त्यावर उद्याचे भविष्य ठरते, हे सीमित अर्थाने खरंय. पण भविष्य ठरविणारा तो काही एकमेव घटक नाही.

नुसत्या माहितीच्या गोण्या भरणे म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी आणि ज्ञानाचं नातं जगण्याशी असतं. असावं. हे नातंचं हल्ली उसवत चाललं आहे. मागच्यावर्षी वर्गात काय शिकलो, ते यावर्षी आठवत नाही. आमचे शिकणे त्या वर्षापुरते. वर्ग बदलला की, अभ्यास विसरतो आणि ते शिकवणारा मास्तरसुद्धा. निष्क्रिय कर्मयोग आचरणे म्हणजे शिक्षण का? मुळात आपल्या शिक्षणपद्धतीत आणि परीक्षापद्धतीत काही वैगुण्ये आहेत. ज्याची स्मरणशक्ती तीव्र, तो प्रज्ञावान ठरतो. प्रज्ञेला पैलू पाडणारी बऱ्यापैकी बरकत अन् प्रतिष्ठा असणारी क्लास नावाची व्यवस्था आहेच दिमतीला. येथे काही पैसे पेरून स्मरणशक्तीला कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासाच्या सरावाचे अनेक प्रयोग करून कर्मयोग साधला जातो. परीक्षेत नेमक्यावेळी नेमके आठवून तंत्रबद्धरित्या पाठ केलेली आणि घोटून, तासून, तपासून घेतलेली उत्तरे लिहिणे म्हणजे गुणवान का?

जगातील साऱ्याच यशस्वी माणसांनी परीक्षेच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवले होते का? लौकिक अर्थाने तंत्र असलेल्या कोणत्याही मंत्रात न अडकलेली उत्तुंग व्यक्तित्वे इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिले तर सहज हाती लागतात. त्यांनी कर्तृत्वाची शिखरे उभी केली. मान्य आहे, साऱ्यांनाच काही सारं होता येत नाही. गुणांचा आणि गुणवत्तेचा संबंध असतोच असा किती? अशी कितीतरी माणसे असतील, जी परीक्षेतील गुणांच्या उंचीत कमी पडली; पण अंगभूत गुणवत्तेने त्यांनी यशाची परिमाणे अधोरेखित केली.

तंत्रशरण पद्धतीत अन् परिस्थितीत आजही फारसा बदल घडला आहे, असं नाही. तुम्हाला आवडो अगर न आवडो बोर्डाने ठरवलेले अन् शाळांनी निवडले तेच विषय घ्या आणि पास होऊन दाखवा. यासाठी परीक्षा नावाचं आव्हान समोर उभं. बरं, या पद्धतीविषयी किती तज्ज्ञांचे ही दोषरहित मूल्यमापनपद्धती असल्याचं मत आहे? वर्षभर घोका अन् दोन-तीन तासात ओका. बस्स, एवढंच. योग्यवेळी योग्य तेच आठवून अपेक्षित उत्तरे लिहिली की, गुणपत्रिकेत उत्तम गुण येऊन विसावतात. बाकी कौशल्यांच्या प्रकटीकरणासाठी कितीसा वाव असतो? महात्मा गांधी म्हणाले होते, ‘आमच्या शिक्षणपद्धतीत दोन्ही हातांचा वापर कधी होत नाही आणि जो एक हात वापरला जातो, तो गृहपाठ, उत्तरपत्रिका लिहाण्यापुरताच.’ अर्ध्याच क्षमता वापरात येत असतील, विकसित होत असतील, तर या व्यवस्थेला परिपूर्ण तरी कसे म्हणता येईल?

गुणांवरून गुणवत्ता ठरवण्याच्या आजच्या जगात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून शिकायला असते, तर गुणवत्तायादीत आले असते का? छत्रपती शिवाजी महाराज काही राज्यशास्त्र विषयात गोल्ड मेडलीस्ट नव्हते, संत तुकाराम महाराज समाजशास्त्राचे पदवीधर नव्हते, संत ज्ञानेश्वरांनी काही तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा, राजनीतीचा अभ्यास करणारे सगळेच स्वकीय-परकीय इतिहासकार, विद्वान एकमुखाने महाराजांच्या राजनीतीला गौरवान्वित करतात. महाराजांविषयी लिहताना त्यांच्या लेखणीला बहर येतो. ‘बुडती हे जन देखवे ना डोळा’ म्हणीत अंतर्यामी अस्वस्थता निर्माण करणारी भावना संत तुकाराम महाराजांच्या वर्तनात समाजाविषयी असणाऱ्या आस्थेतून, कळवळ्यातून प्रकटली होती. ती निर्माण व्हावी, म्हणून त्यांच्याकडे समाजशास्त्रीय विचार वृद्धिंगत करणारे शिकवणी वर्ग नव्हते. तो अंतरीचा जिव्हाळा होता. ‘बंधू-भगिनी’ या दोनच शब्दांनी जगाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या नावापुढे केवळ बॅचलर ऑफ आर्ट, ही पदवी होती.

‘रायबाचं लग्न नंतर, आधी कोंडाण्याचं’ म्हणणारे तानाजी मालुसरे, ‘लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ म्हणीत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे बाजीप्रभू कोणत्या शाळेत त्याग, समर्पण, स्वामिनिष्ठा शिकले. न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन त्यांच्या विद्यालयांच्या गुणवत्ता यादीत आले होते का? कर्तृत्वाची शिखरे निर्माण करणाऱ्या या लोकांच्या लोकविलक्षण जीवनकथा माहीत असूनही अंगभूत गुणवत्तेला नाकारून गुणपत्रकातील गुणांचा आग्रह का, कशासाठी? यशस्वी होणं गुणांवरच अवलंबून असेल तर मग बहुसंख्य माणसे, जे गुणवत्ता यादीत कधीच आले नाहीत, ते जगायला अपात्र ठरतील. आणि गुणवत्ता यादीत आलेले असतात, त्यापैकी बऱ्याच जणांचे काय चालले आहे, त्यांनी पुढे जाऊन काय केले आहे, हे तरी आपणास कुठे माहीत असते?

काळ कोणताही असू द्या. विद्यार्थी तोच असतो. त्याच्या भावस्थितीचा आपण पुरेसा विचार करतो का? इवलासा अंकुर वाढत, वाढत आकाश कवेत घेण्याचे स्वप्न घेऊन ऊन, वारा, पाण्याशी सख्य साधत जमिनीत रुजतो. सुरक्षेचे कवच असले, तर निर्वेधपणे त्याची वाढ होते. मुलांना आश्वस्त करणारं भावनिक सुरक्षेचं कुंपण आपण कधी देणार आहोत? विद्यार्थ्याचा कर्तृत्वसिंधू उचंबळून यावा, म्हणून आपला जीवनबिंदू अर्पून त्याला असीमता प्रदान करणे अवघड असते का? सळसळत्या हिरव्या पानांत, झुळझुळणाऱ्या झऱ्यात, गाणाऱ्या पक्षांच्या गळ्यात, वनराईत नेणाऱ्या वळणावळणाच्या वाटेत, नदीच्या खळाळत्या पाण्यात खरं शिक्षण सामावलेलं आहे. पुस्तकं दडली आहेत. ती उघडून वाचण्यासाठी आम्ही त्यांना तेथे कधी नेणार आहोत का?

शिक्षण एक पद्धती आहे. ती आत्मसात करावी लागते. ती प्रयत्नसाध्य आहे. या प्रयत्नात कदाचित काही चुका जाणते-अजाणतेपणी घडतीलही. अपयश पदरी येईल; पण अपयश हा काही शेवट नसतो. फारफारतर यशाचा चुकलेला मार्ग असू शकतो, रस्त्याचा शेवट नाही. रस्ते आणखीही आहेत. नसतील तर नव्या वाटा तयार करता येतात. चाकोरीतला रस्ता कोणतंही नवं ठिकाण शोधू शकत नाही. निरीक्षणबळावर न्यूटन थोर शास्त्रज्ञ होतो. मदर तेरेसा सेवेने जग फुलवतात. बाबा आमटे आनंदवनात आनंदाचे मळे उभे करतात. थोडे वेगळे काम करायची तयारी असली, थोडी युक्ती असली की, यशाचे मार्ग निर्माण करता येतात. यशस्वी होण्यासाठी कशावरतरी श्रद्धा असावी लागते. ही श्रद्धास्थाने शाळा, शिक्षक झाले तर... कारण, श्रद्धेच्या बळावर एकलव्यसुद्धा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतोच ना!

शाळा केवळ परीक्षा घेऊन उत्तीर्ण-अनुतीर्णतेचे ठसे अंकित करणारे उद्योगकेंद्रे नसतात. येथे येणारी मुले उत्तीर्ण होण्यासाठीच येत असली अन् उत्तीर्णतेची मोहर आयुष्यावर अंकित झाल्याशिवाय चालणार नसले, तरी पुस्तकी ज्ञानातून प्राप्त पदवी म्हणजे सर्वकाही असते, असेही नाही. संपादित केलेली पदवी दिलेल्या परीक्षा, सोडवलेल्या उत्तरपत्रिका, निर्धारित अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याचं प्रमाण असते. यशस्वी आयुष्याचं परिमाण नसतं. सुख-दुःख, समस्या, संकटे यात उत्तीर्ण होण्याएवढं प्रगल्भ मन क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे मिळणाऱ्या अनुभवातून घडवावं लागतं. ते संवेदनशील संस्कारांतून आकारास येत असतं.

मुलांना त्यांच्या आवडीचे अध्यापक मिळाले की, ते आभाळाच्या उंचीशी स्पर्धा करतात. शिक्षक होणे काही योगायोग नसतो, तो योजनापूर्वक आचरणात आणलेला कर्मयोग असतो. जगण्याच्या गणिताची समीकरणे सोडवणारी सूत्रे कदाचित शिक्षकी पेशात सामावली असतील. भाकरीचं उत्तर गवसत असेल येथून. असे असले तरी केवळ सुखांचे साचे घडवून अंगीकृत कार्याला नैतिकतेच्या चौकटीत अधिष्ठित नाही करता येत. त्याला आस्थेचे अनुबंध असले की, प्रघातनीतीचे परीघ पार करता येतात. स्वप्नांना खुणावणाऱ्या क्षितिजांकडे पावले वळती करता येतात. ती आली की, आकांक्षांना आभाळ आंदण देता येतं. ही कविता संवेदनांचे सूर शोधत मनाच्या प्रतालावरून वाहत राहते. सुखांची सुटलेली सूत्रे साकळून आणू पाहते. स्नेहाच्या परगण्यात समाधानाच्या परिभाषा शोधते. मातृवत ममता करणाऱ्या शिक्षिकेप्रती असणाऱ्या आदराचा अध्याय कोरून कृतज्ञतेचं भावकाव्य लेखांकित करते.

समस्यांचे अर्थ समजले की, संवेदनांना सौंदर्य लाभतं. उपेक्षेने जगण्याला प्रश्नांकित केलेल्या घरातलं हे पोर. ना कोणत्या सुविधा, ना पर्याप्त साधने. सकाळ उगवते भाकरीचा प्रश्न घेऊन अन् संध्याकाळ येते भुकेची समस्या घेऊन. रात्र अवतरते भाकरीची स्वप्ने बांधून. विवंचना जगण्यातील शहाणपणाची सांगता करते. जगण्याची उत्तरे शोधतांना पर्याय हरवतात, तेथे कसली आली आहेत आयुष्याला आशयघन उत्तरे? ज्यांच्या आयुष्यातून आशय हरवला आहे; त्याला अभ्यासाचे मोल माहीत नसते, असे नाही. पण पोटात खड्डा पाडणाऱ्या भुकेला हे कुठे ठाऊक असतं? उपाशी पोटाला पक्वानाच्या चवीचे सोहळे नाही साजरे करता येत. मिळलं ते उपाशी पोटात हावरटासारखं ढकलत राहतो, म्हणून कधी बाईंनी झिडकारलं नाही. कसाबसा अभ्यास केला म्हणून फटकारलं नाही की, शिक्षणात कोलदांडा घातला नाही. आकाश हरवलेलं पाखरू सैरभैर होतं. आपलेपणाचा आसरा शोधत राहतं. वावटळीत घरटं विसकटलेल्या पाखराला डहाळीचा आधारही आश्वस्त करणारा वाटतो. बाई गोंधळलेल्या पाखराला क्षणभर विसावा देणारी सावली नाही झाल्या, तर वात्सल्याचा वर्षाव करणारे झाड बनून आश्वस्त करीत राहिल्या. शिकण्यातलं शहाणपण भलेही नसेल आलं त्याला, पण ममतेच्या स्पर्शाने पुलकित झालेल्या पंखात आकाश पेलण्याचं बळ आलं. आभाळ हरवलेल्या पाखराला आकांक्षांची क्षितिजे दाखवणारी दिशा गवसली.  

पडकी शाळा पाहतो, तेव्हा त्याला बाईंची आठवण प्रकर्षाने येते अन् त्या पडक्या शाळेचं देऊळ होऊन जातं. आस्थेचे अनुबंध भक्तीचे आयाम धारण करतात. देव असतो की नाही, माहीत नाही. पण देवत्त्वाची परिमाणे अधोरेखित करणारी माणसे इहतली वसतीला असतात. त्यांच्यापेक्षा देव आणखी वेगळा नसावा. या मुलाला शिक्षिकेच्या रुपात देवत्व गवसलं. त्यांचं असणं त्याच्यासाठी तीर्थक्षेत्राइतकं पवित्र असतं. काळाच्या पटलावरून बऱ्याच गोष्टी नियतीने निर्धारित केलेल्या वाटेने वाहून जातात. ऋतूंच्या बदलांचे आघात झेलत शाळा जीर्ण झाली. तिच्या भिंतींनी धीर सोडला. छताने जमिनीशी सख्य साधत शरणागती पत्करली. नियतीच्या पावलांनी परिक्रमा करून एक वर्तुळ पूर्ण केलं. आरंभ, स्थिती, अंताच्या वाटेने निघालेल्या वस्तूंना विसर्जनाचे सोहळे संपन्न करावे लागतात. काळच त्यांचं प्राक्तन लेखांकित करतो. असं असलं तरी काही गोष्टी नियतीच्या अभिलेखांना आव्हान देत नांदत्या असतात. संस्कारांनी मनात कोरलेल्या आठवणींना ना ऋतूंचे सोहळे संपवू शकत, ना निसर्गाच्या मर्यादा बांध घालू शकत. मनात वसतीला असलेल्या आस्थेच्या ज्योती तेवत राहतात. भक्तीचे दीप प्रज्वलित राहतात. सद्विचारांचे पदर परिस्थितीने उभ्या केलेल्या वादळांपासून वातींना सुरक्षित राखत प्रकाशाचं पसायदान मागत असतात.

संवेदनशीलता सोबत घेऊन आल्याशिवाय या पेशाचे मोल समजणे अवघड. शिक्षकाची ओळख त्याचं निरामय चारित्र्य असतं, तसंच परिणामकारक अध्यापनही. सुंदर शिल्प साकारण्यासाठी कलाकाराच्या सर्जनशील हाताचा स्पर्श दगडाला घडावा लागतो. त्याला ओबडधोबड दगडातील सौंदर्य तेवढे दिसते. त्यातला अनावश्यक भाग काढून तो ते साकारतो. मुलांच्या मनातील विकल्पांचे तण शिक्षकाला वेळीच काढता आले की, त्यांचं जीवन सौंदर्याची साधना होते. अध्यापन समर्पणशील कलावंताची साधना असते. गायकाला रियाज करून सुरांना धार लावावी लागते. तलवारीला पाणी असल्याशिवाय मोल नसतं. म्यान रत्नजडीत अन् तलवार गंजलेली असेल, तर तिचं मोल शून्य असतं.

परंपरेच्या चौकटीत फारफारतर धडे, कविता, गणिते, सूत्रे, व्याख्या शिकवून शिक्षक होता येईलही; पण विद्यार्थिप्रिय अध्यापक नाही होता येणार. शिक्षक म्हणून मिळणारा आदर परिघापलीकडे जाऊन काही शोधल्याशिवाय मिळत नसतो. भोवताल बंदिस्त करणाऱ्या चौकटींचे सीमोल्लंघन केल्याशिवाय आकांक्षांचे आकाश हाती लागत नसते. शिक्षक नावाच्या शिखराला आदर तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या शिखराची उंची लोकांच्या मनातील उंचीपेक्षा काकणभर अधिक असते. शिक्षकाची अनास्था, उदासिनता, निष्क्रियता आदराची सांगता करीत असते. पोटार्थी शिक्षण आणि शिक्षक परिस्थितीत परिवर्तन कसे घडवू शकतील? मुलांच्या मनात शिक्षकांप्रती असणारा आदर उगवत्या सूर्यासारखा स्वाभाविक अन् उमलत्या फुलाइतका सहज असतो. शिक्षणातून संपादित केलेल्या जुजबी ज्ञानावर पोट भरण्याची सोय लावता येते. ती कौशल्ये पुस्तकातील धड्यांमधून मिळतात; पण जीवनासाठी शिक्षण घेताना त्याचे स्त्रोत शोधावे लागतात. या स्त्रोतांच्या शोधाची एक वाट शाळा अन् शिक्षकाच्या दिशेने वळणारी असावी. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••