
कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिपाक असतो. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार असतो, आत्मा नसतो. सत्प्रेरित विचाराने उचललेली चिमूटभर मातीही स्नेहाचे साकव उभे करू शकते. सुखांचा अवास्तव हव्यास माणूसपणावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. तसंही समाधान सापेक्ष संज्ञा असते. पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. अर्थात, हे सगळ्यांनाच अवगत असते किंवा मिळवता येईलच, असे नाही. पण अगत्य सगळ्यांनाच साधते. मोहाचा काकणभर त्याग समर्पणाची परिमाणे उभी करतो, फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संस्कृतीने दिलेल्या संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक सुंदर दिसतात. माणसांचा सहज स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं, नाही का?
काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत जातात? जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यासाठी आपला आसपास समजून घ्यावा लागतो. समजून घेतांना आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे पदर पुसून काढावे लागतात.
माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आपले आकाश हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी आणि अनोळखी वाटांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत राहतात, तसा मनात अधिवास करून असणारा स्वार्थ अधिक प्रबळ होत राहतो. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाचा परीघ विस्तारत जावून संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात दिशा हरवून. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो.
साऱ्यांना स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस लागली आहे. सुखांच्या प्राप्तीची परिमाणे बदलत आहेत. त्यांचा परीघ संकुचित होतो आहे. त्याग. समर्पण आदि गोष्टी सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या संकुचित परिघाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलंय. या परिघाच्या प्रदक्षिणा त्याच्या प्रगतीची परिभाषा होऊ पाहते आहे. माणसातील माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणे आपल्या वर्तनातील विपर्यास नाही का?
0 comments:
Post a Comment