कविता समजून घेताना... भाग: सव्वीस

By

जात पण लई मेन असते साहेब...

चोवीस तास उलटून गेले तरी
लागला नाही तपास
की निषेधाचा
एकही उमटला नाही सूर...

चोवीस तास उलटून गेले तरी
कोणी फेकले नाहीत दगड
पोलीस ठाण्यावर
गावातल्या वस्त्या वाड्यांवर
अजून कुणी फेकले नाहीत टायर...

चोवीस तास उलटून गेले तरी
कुणी बसलं नाही
उपोषणाला पुतळ्याजवळ
वा केली नाही कुणी
प्रार्थनास्थळाची तोडफोड...

चोवीस तास उलटून गेले तरी
कुणी केली नाही मागणी
सीबीआय चौकशीची
आणि तातडीने एखादा
कायदा रद्द करण्याची...

चोवीस तास उलटून गेले तरी
मीडियावाल्यांना मिळाली नाही
एखादी ब्रेकिंग न्यूज
वा सुरूही करता आली नाही
एखादी महाचर्चा...

बघून सारं गपगार
विचारलं एकाला की,
खरं आहे ना, ऐकलं ते?
तर म्हणाला तो जोशात
खरंच हाये साहेब खरंच हाये,
झालाय रेपबीप पण अजून तिची
जात नाही कळली,
म्हणून सगळे गपगार हाये...

जात पण लई मेन असते ना साहेब
नुस्तं बाई आहे म्हणून
आपण काढले मोर्चेबिर्चे
आन उद्या निघाली बाई
दुसऱ्याच जातीपातीची तर
हायकमांड ठिईल का आम्हांला...

चोवीस तास उलटून गेले तरी
कळाली नाही बाईची जात
आणि पोस्टमार्टेम मध्येही
सहजासहजी आली नाही लक्षात...

चोवीस तास उलटून गेले तरी
लागला नाही तपास
उमटला नाही निषेधाचा सूरही...


मनोहर विभांडिक

सत्य कल्पितापेक्षा अधिक भयावह असते, असे म्हणतात. यात काही अतिशयोक्त आहे असे नाही. कधीकधी अशा काही अनपेक्षित गोष्टी समोर येतात की, नसला तरी त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. त्या नाकारता येत नाहीत अन् स्वीकारताही. अशावेळी अगतिक शब्दाचा अर्थ आकळतो. इहतली नांदणाऱ्या सुखांचं केंद्र माणूस आहे. पण माणूसपणावरचा विश्वास संपून जावा अशा गोष्टी घडतात. तेव्हा माणूस म्हणून आपल्या मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते. माणूस विचारशील वगैरे जीव असला, तरी तो स्वप्नांच्या प्रदेशात विहार करणाराही आहे. कल्पनांचे पंख लेऊन आकांक्षांच्या गगनात विहार करताना त्याला आनंद गवसत असेलही, पण सर्वकाळ तो स्वप्नांच्या झुल्यांवर झोके घेऊ शकत नाहीं ना? वास्तवाच्या वाटेने त्याला चालावेच लागते. हे सगळं ज्ञात असलं, तरी परिस्थितीच्या वणव्यांपासून पलायन करण्याचा तो प्रयास करीतच असतो. सुखांची आस असली, म्हणून ती काही सहजी चालून त्याच्या अंगणी नाही येत. शांतता सुखांच्या परगण्याकडे नेणारा पथ आहे. सहजपणे जगणे माणसाला प्रिय असले, तरी ते आयुष्यात सहजपणे अधिष्ठित नाही होत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते काही वळचणीचं वाहतं पाणी नाही. त्याचे काही आखीव सूत्रे नसतात, ज्यात जगण्याच्या किमती कोंबून अपेक्षित उत्तरे हाती लागतील.

माणूस शांतताप्रिय जीव वगैरे असल्याचं सगळेच सांगत असले, त्याला तसं वाटत असलं तरी हे अर्धसत्यच. अर्थात हे म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. पण वरकरणी तसे वाटत असले, तरी शांततेच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. प्रसन्नतेचा परिमल घेऊन गंधाळणारे क्षण आयुष्यात अनवरत नांदते राहावेत, ही त्याची सार्वकालिक कामना असली तरी माणूस म्हणून त्याच्या जगण्याचे परिशीलन केले की कळते, वास्तव अन् परिस्थितीत केवढे अंतराय आहे. माणसाच्या वाटचालीच्या इतिहास उकरून काढला अन् त्यात थोडं डोकावून पाहिलं, तर किती दिवस असे असतील की, त्या दिवसातले क्षण तो केवळ आणि केवळ आपले समजून जगला? विश्वकल्याणाच्या तो वार्ता वगैरे करीत असला, तरी कल्याणाची परिभाषा त्याच्यापासून सुरु होते अन् त्याच्याजवळ येऊन पूर्ण होते. स्थिर जीवनाचे गोडवे गात असला, तरी त्याचं मन कधी स्थिर असतं? स्थैर्य संपादित करता यावं, म्हणून हाती शस्त्रे धारण करून तो शांती प्रस्थापित करायला निघाला. हाती घेतलेलं शस्त्र शांतीची सूक्ते गाण्यासाठी असल्याचे सांगत आला आहे. जगाला मरणपंथावर नेणाऱ्या युद्धांचा अभ्यास केला की कळते, या विनाशामागे त्याचे धर्मवंशजातीचे अहं उभे आहेत.

माणसाला कोणी समाजशील, विचारशील, समायोजनक्षम वगैरे म्हणत असला अन् तो तसा असला, तरी त्याच्या अंगभूत मर्यादा दुर्लक्षून नाही चालत. या मर्यादाच त्याच्या असण्या-नसण्याचे अर्थ अधोरेखित करतात. कलह एकवेळ मान्य करता येईल. इहतली वास्तव्यास असणारे सगळेच जीव एका मर्यादेपर्यंत कलहाच्या वाटेने चालतात. पण त्यांचे संघर्ष शारीरिक गरजांच्या पूर्तीसाठी आणि पूर्तीपुरते असतात. पूर्ती हा त्यांचा पूर्णविराम असतो. भले जंगलाचा न्याय क्रूर असेलही, पण त्यात टोकाचे अहं नसतात. आपल्या मर्यादा आकळल्या की, पराभव मान्य करून माघार घेण्यात कोणाला वावगे नाही वाटत. पण माणूस मात्र याला अपवाद. माघारी वळताना तो धुमसत असतो. धुमसते ज्वालामुखी माणसांची विभागणी अनेक परगण्यात करतात. कोणाला आपलाच वंश विश्वात विशुद्ध असल्याचा साक्षात्कार घडतो. कोणाला आपल्या धर्मापेक्षा परिणत तत्वज्ञान अन्यत्र आढळत नाही. कुणाला आपल्या जातीचा अभिमान स्वस्थ बसू देत नाही. कोणाला केवळ आपला पंथच विश्वकल्याणाचा रास्त मार्ग वाटतो. प्रत्येकाचे अहं आपणच एकमेकाद्वितीय असल्याचे मानतात. श्रेष्ठत्वाच्या व्याख्या प्रत्येकाने आधीच निर्धारित करून घेतलेल्या असतात. सहिष्णुता वगैरे शब्द अशावेळी अंग आकसून कुठेतरी अंधाऱ्या कोपऱ्यात आपला अधिवास शोधत असतात.

अन्य जिवांच्या जगात जातीचे पेच असल्याचे अद्याप तरी कोणाला अवगत नाही. त्यांच्यातले भेद निसर्गाच्या मर्यादांनी अधोरेखित केलेल्या रेषेपलीकडे कधी जात नाहीत. पण माणसांच्या जगात भेदांच्या भिंती पावला-पावलांच्या अंतरावर उभ्या आहेत अन् त्यांची उंची कशी वाढवता येईल, म्हणून सगळेच प्रयत्नरत असतात. जगात अन्य परगण्यात जात असल्याचे ज्ञात नाही. पण भारत नावाचा खंडतुल्य भाग एकमेव असावा, जेथे माणसांच्या ओळखी नावा-आडनावावरून होतातच; पण त्यातून त्याच्या जातीचे संदर्भ आवडीने शोधले जातात अन् बऱ्याच जणांना ते अधिक महत्त्वाचे वाटतात. भारत विषमतेचे माहेरघर असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच नमूद करून ठेवलं आहे. येथे प्रत्येकाला आपापले मनोरे प्रिय आहेत अन् ते अधिक उंच करायचे आहेत. माणुसकीचे शिखर उभं करायच्या वार्ता कोणी करीत असलं, तरी या शिखरावर आपलं माणूस शीर्षस्थानी कसे असेल, याचीच प्रयोजने शोधली जातात. जातीच्या निर्मूलनासाठी अनेक धुरिणांनी प्रयास करूनही आपण आपल्या विचारविश्वातील विसंगतीला विचलित होऊ दिले नाही. हे अविचल राहणेच आपल्या वेगळेपणाची परिभाषा आहे अन् अनेक प्रश्नांना अधोरेखित करायला एक कारण. विज्ञानतंत्रज्ञान युगाच्या वार्ता करीत असलो, तरी अजूनही फार काही हाती लागलं आहे असं नाही.

देशाचं भविष्य लोकांच्या वर्तनव्यवहारात साकळलेलं असतं. व्यवहारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, उत्तरांचे विकल्प समोर दिसू लागतात. प्रगतीचे पथ आखता येतात. माणूस नावाचं बहुआयामी विश्व सन्मानाने उभं करता येतं. शेकडो वर्षांचे संचित घेऊन येथील संस्कृती नांदते आहे. तिचे पात्र धरून इतिहास वाहतो आहे, कधी जयाचे उन्माद, तर कधी पराभवाचे शल्य उरात घेऊन. काळाच्या उदरातून अनेक गोष्टी प्रसवल्या. काही मांगल्याचा घोष करीत, काही विसंगतीचे विकल स्वर घेऊन. काळाच्या कुठल्यातरी तुकड्याची सोबत करीत जात जन्मली अन् वाहत राहिली समाजमनाचे किनारे धरून. आजही ती सुखनैव नांदते आहे माणसांच्या मनात. माणूस नावाचा प्राणी जन्मत नाही, घडवला जातो, असं म्हणतात. ही जडणघडण संचित असते त्याच्या वाटचालीचे. भूतकाळाचे परिशीलन घडून वर्तमानात वावरताना भविष्य समृद्ध करण्याचा प्रयास माणसाची अन् त्याच्या इतिहासाची ओळख असते. पण सगळं काही करूनही त्याला व्यवस्थेत विसावलेल्या वैगुण्यांच्या वर्तुळांच्या पार काही होता आले नाही. जातवास्तव येथील अटळ भागधेय आहे अन् याला मिरवण्यात धन्यता मानणारेही आहेत. माणसाला जन्मासोबत ज्या काही गोष्टी मिळत असतील, त्या असोत. पण येथे जन्माने जात आंदण मिळते अन् ती अखेरपर्यंत सोबत करते. जात संपवायच्या वार्ता कोणी कितीही करीत असलं, तरी ते केवळ स्वप्नं आहे, निदान अजूनतरी.

नेमक्या याच वेदनेला घेऊन ही कविता संवेदनांचे किनारे धरून सरकत राहते. आपल्या मातीत रुजलेल्या जात नावाच्या वैगुण्याला अधोरेखित करते. खरंतर प्रगतीचे पंख लेऊन विश्वाला अंकित करण्याची स्वप्ने बघणाऱ्या माणसांच्या जगाला हे भाष्य अभिमानास्पद आहे असे नाही. जात माणसांच्या जगण्यातून निरोप घेऊन कायमची जावी म्हणून सारेच उद्घोष करतात, पण तिलाच आस्थेने जतन करण्यात कोणतीच कसर राहू देत नाहीत. माणूस भौतिक प्रगतीचे इमले बांधत आला, पण त्याला अद्याप माणूस काही उभा करता आला नाही. सुसंगत आयुष्याच्या अपेक्षा करीत असला, तरी जगण्यात विसावलेले विसंगत विचारांचे तुकडे सांधता आले नाहीत. कोण्या मानिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे धागे धरून संवेदनशील मनांना ही कविता प्रश्न विचारते, चोवीस तास उलटून गेले, तरी घटनेचा तपास का लागला नाही? पण हाच प्रश्न काळजाला कापत जातो. त्याच्या आवर्तात अडकवून गरगर फिरवतो. विचारांची आंदोलने उभी करतो. संवेदना जाग्या असणारी मने गलबलतात.

तपास का लागला नाही? या प्रश्नांचे उत्तर जातीच्या चौकटीत बंदिस्त झालं असेल तर... लागेलच कसा? कोण्या मानिनीची झालेली मानखंडना माणसांसाठी महत्त्वाचा विषय नसून, तिची जात अधिक मोलाची. तिच्या जातीचे संदर्भ हाती लागण्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा असते. अनेकांना तिच्या मरणापेक्षा जातीत अधिक स्वारस्य का असावे? आपल्या सार्वजनिक जीवनातील यशाची सूत्रे त्यात एकवटलेली दिसतात म्हणून? की आपापले स्वार्थ साध्य करण्याची संधी तिच्या निष्प्राण देहात सामावलेली असते? कलेवराला जात चिकटवली की येथे मरणालाही महत्त्व मिळतं. पण माणसाला अन् माणुसकीला मूठभर विश्वात ओंजळभर जागा नसावी याला काय म्हणावे?

माणसांच्या मरणाचेही सोहळे व्हावेत, याला संवेदनेच्या कोणत्या निकषात मोजणार आहोत आपण? मरणारा माणूस आहे. अत्याचार झालेला देह माणसाचा आहे, यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे, याला महत्त्व असेल, तर आपण कोणत्या प्रगतीच्या वार्ता करीत आहोत? कवी म्हणतो, घडलेल्या घटनेच्या संदर्भात निषेधाचा एकही सूर का उमटला नसेल? कुठल्या तरी घटनेचे धागे हाती धरून कोणी पोलीस ठाण्यावर दगडांचा अनवरत वर्षाव करणारे का गप्प असतील? कुणी गावातल्या वस्त्यावाड्यांवर पेटते टायर फेकून आपल्या पराक्रमाचे पलिते प्रज्ज्वलित करतो. कुणी उपोषणाचं अस्त्र हाती धारण करून पुतळ्याजवळ निषेधाचे फलक फडकावतो. कोणाचा संयम सुटून प्रार्थनास्थळाची तोडफोड घडते. कुणी सीबीआय चौकशीची मागणी करतो, तर कुणी एखादा कायदाच काढून टाकण्याची. मीडियावाल्यांनाही या घटनेत ब्रेकिंग न्यूज मिळाली नाही. कदाचित बातम्या ब्रेक करायलाही जातीच्या वर्तुळांचे परीघ बुलंद असायला लागत असतील. अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी, वैचारिक पातळीवर किती अप्रगत वगैरे आहोत हे सांगणाऱ्या महाचर्चा सुरूही करता आल्या नाहीत. संभवतः अशा चर्चांसाठी माणूस जातीने ओळखण्याइतका कोणीतरी असावा लागतो का? कदाचित टीआरपीच्या अंकात या अभागी आयुष्याचे गणित सामावत नसेल का?

सारं गपगार बघून एकाला विचारलं, खरं आहे ना, ऐकलं ते? तर तो म्हणाला, खरंच हाये साहेब, खरंच हाये. झालाय रेपबीप; पण अजून तिची जात नाही कळली, म्हणून सगळे गपगार आहेत. जात पण लई मेन असते ना साहेब! नुस्तं बाई आहे, म्हणून आपण काढले मोर्चेबिर्चे आन उद्या निघाली बाई दुसऱ्याच जातीपातीची, तर हायकमांड आम्हांला ठिकाणावर राहू देईल का? खरंतर या वाक्यात एक वाहणारी जखम आपणच आपल्याला उसवत नेते. येथेच माणुसकीच्या साऱ्या निकषांचा पराभव होतो. सारे संस्कार, सगळे शिक्षण कुचकामी ठरते. माणसांनी प्रगतीची मिजास करावी असे काय आहे त्याच्याकडे? अशावेळी सुरेश भटांच्या शब्दांची प्रकर्षाने प्रतीती येते ते म्हणतात, ‘पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकाला, कोणी विचारीत नाही माणूस कोण मेला.’

खरंतर मरणाऱ्या बाईची जात कळली नाही. कळेलच कशी? मरणाला कसली आलीय जात? मरण काही जातीची लेबले लाऊन येत नसतं. पोस्टमार्टेम मध्येही सहजासहजी आली नाही ती लक्षात. येईलच कशी? माणसाला जात चिटकवता येते, पण शरीराला कशी चिटकवता येईल? निसर्ग देह घेऊन इहलोकी पाठवतो. माणसे त्यालाही टॅग लावून श्रेष्ठत्वाच्या किमती ठरावतात. ज्याचा  टॅग  मोठा, तो कुलीन ठरत जातो. जातीच्या कक्षा विस्तारत जातात, पण माणूस चौकटीत बंदिस्त होताना संकुचित होत राहतो. तो देह स्त्रीचा असेल तर जातीचे टोकं अधिक धारदार बनतात. कारण जात श्रेष्ठत्वाच्या परिभाषा तिच्या शरीराभोवती घट्ट बिलगलेल्या असतात. जातीची प्रमाणपत्रे घेऊन वावरणारे रक्तशुद्धी, वंशशुद्धीचे अनन्यसाधारणत्व अधोरेखित करण्याची कोणतीही संधी जावू देत नाहीत. माणसाने शरीराच्या व्याधींचे निदान करण्याचे शास्त्र अवगत केले; पण विज्ञानाला अजून देहातील जात काही शोधता आली नाही. ही त्याची मर्यादा मानवी की निसर्गाची देणगी? ती कोण होती? हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. लागलाच नाही तपास तिच्या जातीचा. म्हणून उमटला नाही निषेधाचा सूर. कदाचित विज्ञानाने जात शोधून काढता आली असती, तर जमा झाले असते का, अन्याय झाल्याच्या वार्ता करीत माणसे शेकडो, हजारोंच्या संख्येने?

‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ कवयित्री बहिणाबाईनी आपल्या कवितेतून हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. कारण ज्याला हा प्रश्न विचारला त्याला ‘माणूसपण’ म्हणजे काय, हे पूर्णतः कळलेले आहे असे म्हणवत नाही. कळले असते तर माणूसपणाची आठवण करून द्यायची आवश्यकताच राहिली नसती. माणूस निसर्गाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, असे म्हणताना कितीही चांगले वाटत असले, तरी तो तसा असेलच याची खात्री देणे अवघड आहे. म्हणूनच कदाचित माणसाला ओळखताना काहीतरी निसटतेच.

विश्वातील कोणताही धर्म, त्याचं तत्वज्ञान हिंसेचे समर्थन कधीच करीत नाही. अवघं विश्व एकाच चैतन्याचा आविष्कार असल्याचे मानले जाते. तरीही माणसे असं का वर्ततात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होत आहे. माणुसकीधर्मच महान असल्याचे दाखले जागोजागी उपलब्ध असूनही, संकुचित मनाची मूठभर स्वार्थांध माणसे हा कोणता खेळ खेळत असतील? त्यांना कोणत्या तत्वांची प्रतिष्ठापना करायची असते? धर्मवंशजात जगण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या निवडीचा भाग झाला. तो मतभिन्नतेचा विषय असू शकतो. जगण्यासाठी तो आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचं त्यानेच शोधायला हवं. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment